नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात 42 हजार 625 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 562 रुग्णांचा मृत्यू झाला. याचदरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36 हजार 668 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याच कालावधीत कोरोनाच्या दैनंदिन नव्या रुग्णांमध्ये केरळमध्ये वाढ झाली आहे. केरळात सर्वाधिक 23 हजार 676 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढून 34.49 लाख झाली आहे. केरळमध्ये सलग सहाव्या दिवशी 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 17 लाख 69 हजार 132 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 25 हजार 757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 3 कोटी 9 लाख 33 हजार 22 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही चार लाखांहून अधिक आहे. देशात विविध राज्यांमध्ये एकूण 4 लाख 10 हजार 353 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण केरळमध्येच असून 1 लाख 73 हजार 736 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 6 हजार 005 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. महाराष्ट्रात अजून 77 हजार 729 रुग्ण उपचाराधीन आहेत.