नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊन राज्यात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता आली आहे.त्यानंतर मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मागच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
के.के. शैलजा यांनी केऱळमध्ये कोरोनाच्या साथीला रोखण्यामध्ये सुरुवातीच्या काळात प्रशंसनीय कार्य केले होते. तसेच राज्यात निपाह विषाणूला रोखण्यासाठीही त्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली होती. केरळमध्ये २०१८ आणि २०१९ मध्ये निपाह विषाणूचा फैलाव झाला होता. मात्र त्याला रोखण्यात केरळ सरकार यशस्वी ठरले होते. त्यामुळे त्यांची वर्णी मंत्रिमंडळात न लागल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.
नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मागच्या सरकारमधील मुख्यमंत्री पी विजयन सोडले तर कुणालाच संधी मिळालेली नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केके शैलजा यांची पक्षाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडी सरकारचा शपथविधी हा २० मे रोजी होणार आहे.