पेडणे/ प्रतिनिधी
पेडणे पोलिसांनी निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली काल सोमवारी थोरलेबाग केरी येथे एका घरावर धाड घालून एक कोटीं 20 लाख रुपये किंमतीचा अमलीपदार्थ जप्त करण्याबरोबरच स्थानिक संशयित रामा केरकर, रश्मी केरकर आणि शिवाजी केरकर या तिघांना गजाआड केले आहे. या धडक कारवाईमुळे पेडणे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे.
गेल्या वर्षी दीड कोटीची गांजा लागवड मोरजी मरडीवाडा येथे एका रशियन पर्यटकाकडून जप्त करण्यात आली होती, त्यानंतरची पेडणे पोलिसांची ही अमलीपदार्थविरोधी दुसरी मोठी कारवाई आहे.
केरकर कुटुंबाच्या यांच्या घरावर धाड
पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी माहिती देताना सांगितले की थोरलेबाग केरी या ठिकाणी एका घराच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात गांजा लागवड केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार थोरलेबाग केरी येथील रामा केरकर यांच्या घरावर धाड घालून एक कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले. रामा केरकर, रश्मी केरकर आणि शिवाजी केरकर या स्थानिकांना अटक केली आहे.
एक कोटी वीस लाखांचे अमलीपदार्थ
गांजाची झाडे दोन किलो 29 ग्राम असून त्यांची किंमत पाच लाख रुपये आहे. सुका गांजा 1 किलो असून त्याची किमत 1 लाख 30 हजार रुपये आहे. दीड किलो चरस मिळून एकूण एक कोटी 20 लाख रुयये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.
केरकर कुटुंबातील तिघांना अटक
संशयित रामा केरकर (22), रश्मी केरकर (44) व शिवाजी केरकर (34) यांच्या विरुद्ध भारतीय दंड सहिता 20 (अ), (1) 20 (ब) (2) (क) आर । डब्ल्यू 29 नुसार अमलीपदार्थ गुन्हा कायद्या अंतर्गतही गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसुन्न, उपअधीक्षक गजानंद प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जिवबा दळवी, उपनिरीक्षक संजीत कानोळक, उपनिरीक्षक हरीश वायंगणकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, विनोद पेडणेकर, रवी म्हाळोजी, अनिश्कुमार पोके, यशोदीप उगवेकर, जीवन गोवेकर, महेश नाईक, उदय गोसावी, मिथिल परब, भास्कर च्यारी, स्मिता गावस, तृप्ती सातोस्कर आदींनी या कारवाईत भाग घेऊन कारवाई केली.
यापुर्वी 5 रोजी पेडणे पोलिसांनी गावडेवाडा मांदे येथे अशीच धाड घालून गांजाची 3 लाखांची झाडे जप्त केली होती.
मुख्य संशयित मोकाट
या अमलीपदार्थप्रकरणात गुंतलेला मुख्य संशयित या कारवाईपासून अलिप्त असल्याची चर्चा दिवसभर केरी गावात चालू होती. मुख्य संशयित आजारी असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रविवारी 18 रोजी रुग्णवाहिकेतून हलवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांनी या तिघांना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधारास अटक करुन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घ्यावा, अशी मागणी गावात होत आहे.