अमर वांगडे / परळी :
दरवर्षी येतो पावसाळा अन् पुन्हा पुढे येतात त्याच जिवघेण्या समस्या. अशीच काहीशी अवस्था सातारा तालुक्यातील केळवली गावाची झाली आहे. केळवली हे दाट वनराईत वसलेले टुमदार असे गाव. मात्र, याच गावाच्या वर असलेल्या डोंगरावरील महाकाय दगड केळवली गावाचा वेध घेतो की काय? अशाच भितीच्या छायेखाली ग्रामस्थ जीव मुठीत घेवून गेली कित्तेक वर्ष जगत आहेत. नुकत्याच घडलेल्या महाडमधील तळीये गावासारखी अवस्था केळवलीची झाली तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
परळी खोरे हे अतिपर्जन्यमान असलेले ठिकाण असून याच भागातील असलेले केळवली (ता. सातारा) गाव हे दुहेरी संकटात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. डोक्यावर असलेली महाकाय दगडाची टांगती तलवार अन् वर्षानूवर्ष काडी न काडी जमा करुन उभा केलेला संसार नक्की करायचं तरी काय हा मुख्य प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे. गेली कित्तेक वर्षांपासून केळवली येथील ग्रामस्थांनी संरक्षक भिंत वा हा महाकाय दगड हटवण्याची मागणी ही वेळोवेळी प्रशासनापुढे केली मात्र ही कागदपत्रे अजूनही प्रोसेसमध्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. या भागातील पावसाचा हाहाकार पहता तळीये-माळीण सारखी दुर्दवी घटना घडल्यावर, येथील ग्रामस्थांचे जीव गेल्यावर प्रशासन सतर्क होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केळवली‘तळीये’च्या मार्गावर
गेल्या आठवडाभरापासून परळी खोऱ्यातील पावसाने संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले. दरडी पडणे रस्ता खचणे या सारख्या घटना होत असल्याने केळवली ग्रामस्थांचा थरकाप उडत आहे. महाड येथील तळीये येथे भूस्कलन झाले. मात्र केळवली गावावर डोंगरावरील महाकाय दगड गावाचा वेध घेत असल्याने प्रशासनाने तात्काळ उपायोजना नाही केली तर केळवलीला तळीये सारखी घटना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरवर्षी होतो नुसताच पाहणी दौरा
पावसाळा आला की सांडवली केळवली येथील धोकादायक ठिकाणांचा अधिकाऱ्यांकडून फक्त पहाणी दौरा होतो. नुकसानीचे आढावे घेतले जातात. काही काळासाठी स्थलांतरीत केले जातात. मात्र कायमस्वरुपी धोका मात्र गावावर जैसे थे राहिला आहे. मग दरवर्षी दौरे करुन भविष्यात येणारे संकट टळणार नाही. दुरदैवी घडण्याआधी ठोस उपायोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
ग्रामस्थांच्या प्रस्तावांना केराची टोपली
डोंगर माथ्यावरील महाकाय दगडाची टांगती तलवार ही केळवली ग्रामस्थांच्या जीवावर उठली असताना ग्रामस्थांनी 29/08/2017 पासून सातत्याने प्रस्तावांचा पाऊस प्रशासनासमोर मांडला असला तरी नुसती प्रोसेस सुरु असल्याचे संबंधीतांकडून सांगितले जाते. अन् वृत्तपत्रांतून सदर घटनेची वार्तांकन केले की दौरे सुरु होतात. पण मूळ प्रश्न व उपायोजना लांबच राहत असल्याचे ग्रामस्थांनी‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी सुदैवाने दुर्घटना टळली
आज या विषयासाठी आम्ही ग्रामस्थ 2017 पासुन प्रयत्न करतोय , पण त्याच्यावर उपाय कोणताच नाही. गेल्यावर्षी एक दगड गावावर आला सुदैवाने आम्ही वाचलो आता या वर्षी तर सगळा लोट पाण्यासह दगड घेऊन दारात आला देवाची मेहरबानी म्हणून आमची कुटुंब वाचली. गेल्यावर्षी दगड पडून व या वर्षी दगड पडून सुद्धा कोणताही शासकीय अधिकारी गावाकडे फिरकला नाही -शिवराम केरेकर, केळवली ग्रामस्थ