वार्ताहर/ परळी
साताऱयातील पर्यटन क्षेत्रांमध्ये दरवर्षी नवनवीन ठिकाणांचा समावेश होत असतो. मात्र गावातील वादावादी आणि मतभेदांमुळे काही पर्यटन क्षेत्रे अजूनही पर्यटकांच्या नजरेत पलीकडेच आहेत. तसेच यामुळे रोजगार निर्मितीस वाव असूनही तेथील परिस्थिती भकास होत आहे. अन् तरुणाईला रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागते त्यातीलच केळवली हा धबधबा.
या ठिकाणी आल्यावर निसर्गाचा अद्भुत असा निसर्गसौंदर्य अनुभवयास मिळतो. मात्र ग्रामस्थांची एकी नसल्याने केळवली धबधबा पाहिजे असा नावारूपाला आलेला नाही. मात्र ठोसेघर कास या ठिकाणी कसून चौकशी होत असल्याने पर्यटकांनी केळवली धबधबाकडे रीघ लावल्याचे दिसत आहे. ग्रामस्थांकडून बॅनर लावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले तरी त्याला हरताळ फासून उच्छाद मांडला जात आहे त्यामुळे पर्यटकांना हो जरा दमानं कोरोना कमी झाला आहे. संपला नाही हे भान राहू द्या, असे ग्रामस्थांकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे.
पहिला पाऊस हा बऱयापैकी झाल्याने जिल्हय़ातील धबधबे फेसाळले तर डोंगरांनी ही हिरवा शालू नेसला आहे. हे पाहण्यासाठी शहरातून शेकडो पर्यटक हे परळी खोऱयातील केळवली धबधब्याकडे दाखल होत आहेत. पर्यटक जोमात ग्रामस्थ कोमात गेल्या सारखीच परिस्थिती होत आहे. ना मास्क, ना कुठलं सोशल डिस्टन्स यामुळे कोरोनाचा फैलाव ही मोठय़ा प्रमाणावर होऊ शकतो हेच ओळखून ग्रामस्थांनी स्वखर्चातून केळवली धबधबा मार्गावर कोरोना नियमांचे बोर्ड देखील लावले आहे. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव या भागात होणार नाही.