ऑनलाईन टीम / नाशिक :
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी रेशन कार्डधारकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रती व्यक्ती पाच किलो अन्न धान्य रेशन दुकानांमधून देण्यात येत आहे. राज्यातील 3 कोटी 8 लाख एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून 1 मे ऐवजी आता 24 एप्रिलपासूनच 1.56 लक्ष मे टन धान्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
भुजबळ म्हणाले, शिधावाटप दुकानांमधून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) कार्डधारकांना अन्नधान्य देण्यात येत नव्हते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी 59 हजार ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना 12 रुपये प्रति किलोने दोन किलो तांदूळ व 8 रुपये किलोने 3 किलो गहू प्रति व्यक्ति देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या धान्याचे वाटप यापूर्वी 1 मे रोजी सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, आता अनेक ठिकाणी 14 एप्रिल पासून हे धान्य वाटप सुरु करण्यात आले आहे.
केसरी कार्डधारकांना यात 92 हजार मेट्रिक टन गहू व 62 हजार मेट्रिक टन तांदूळ एका महिन्यासाठी पुरवठ्याचे काम सुरू केले आहे. संपूर्ण राज्यात 1 मे पर्यंत मे महिन्यातील धान्याचे वाटप होईल. टाळेबंदीच्या काळात राज्यातील 52 हजार 424 दुकानांच्या माध्यमातून साडेसात कोटी लोकांना 7 लक्ष मेट्रिक टन धान्य अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत वितरित करण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.