प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या आपत्कालिन स्थितीत कोणीही उपाशी राहू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वाटप सुरु केले आहे. परंतू, हे धान्य अंत्योदय व प्राधान्य कार्डधारकांना धान्य दिले जात असून उर्वरित केशरी कार्डधारकांना मे महिन्यात वाटप केले जाणार आहे. त्यामुळे सदरचे धान्य एप्रिल अखेर वाटप करावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
केशरी रेशनकार्ड धारकांची संख्या राज्यात जास्त असून हे सर्व मध्यमवर्गिय कुटूंबे आहेत. सध्याच्या आपतकालीन परिस्थीतीमध्ये जुळवून घेत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामध्ये केशरी शिधापत्रिका धारकांना रेशनधान्य हे मे महिन्यामध्ये वितरीत झाल्यास अशा कुटूंबाची फारच परवड होणार आहे. त्यामुळे हे धान्य मे महिन्यात वितरीत करण्याऐवजी एप्रिल अखेर वितरीत करावे तसेच, जून महिन्यासाठी अतिरिक्त कोटय़ाची तरतूद शासनामार्फत करावी अशी मागणी या निवेदनाव्दारे खासदार मंडलिक यांनी केली आहे धान्य वाटप होत असताना रास्त धान्य दुकानदारांकडून गैरप्रकार होवू नयेत याकरीता योग्य ती खबरदारी शासनाकडून घ्यावी. तसेच नागरीकांनी सोशल डिन्स्टिंग नियमाचे पालन करुन धान्य घ्यावे, असे आवाहन खासदार मंडलिक यांनी केले आहे.