संजू परब यांचे टीकास्त्र : खासदार राऊत, अतुल रावराणेंनी ‘क्वारंटाईन’ करावे!
वार्ताहर / सावंतवाडी:
मुंबई-पुणे येथून सिंधुदुर्गात येण्यास जिल्हा प्रशासन गोरगरीब, सर्वसामान्यांना आठकाठी आणते. मग खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे अतुल रावराणे यांना जिल्हय़ात प्रवेश कसा दिला गेला. मुंबईत हॉटस्पॉट आहेत. त्या भागातून हे दोन्ही नेते आले आहेत. त्यांना क्वारंटाईन का केले गेले नाही? त्यांच्या वावरामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाला धोका आहे. त्यांना प्रशासनाने क्वारंटाईन करावे, असे भाजप प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेला वाऱयावर सोडले आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, नासीर शेख उपस्थित होते.
परब म्हणाले, जिल्हा सुस्थितीत आहे. जिल्हय़ातील जनता सुरक्षित राहवी म्हणून सर्वांचे प्रयत्न आहेत. जिल्हा प्रशासन डोळय़ात तेल घालून काम करत आहे. पण मुंबईतून हॉटस्पॉट असलेल्या भागातून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व अतुल रावराणे हे दोघेही जिल्हय़ात येऊन फिरत आहेत. त्यांना क्वारंटाईन का केले गेले नाही. प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे. आमदार नीतेश राणे हे मुंबईतून जिल्हय़ात आले. त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. जिल्हय़ाची सुरक्षितता महत्वाची आहे.
परब म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता मला सांगते, आमदार दीपक केसरकर या संकटकाळात कोठे दिसत नाहीत. त्यांनी या मतदारसंघात रहायला हवे होते. जेव्हा ते मुंबईतून एका दिवसासाठी सावंतवाडीत आले एक तास राहून पुन्हा निघून गेले. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीत स्वत:ला होमक्वारंटाईन करून जनतेला येथे राहून धीर द्यायला हवा होता. तसे न करता ते मुंबईत क्वारंटाईन झाले. केसरकर हे आमदार आहेत ते सावंतवाडीत राहिले असते तर जनतेला आधार होता. आता जनता खचली आहे. केसरकरांनी मतदारसंघातील जनतेला वाऱयावर सोडले. गावागावातील गोरगरीब रोजंदारी कामगारांना अन्नधान्याची गरज होती, असे परब यांनी स्पष्ट केले.
आजपासून ‘कमळ थाळी’
परब म्हणाले, भाजपच्यावतीने बुधवार 22 एप्रिलपासून शहरात कमळथाळी दिली जाणार आहे. नगरसेवक सुधीर आडिवरेकर हे ‘कमळ थाळी’ देणार आहेत. तर शहर उपाध्यक्ष अजय गोंधावळे 23 एप्रिल रोजी देणार आहेत.