जांबोटी / वार्ताहर
सहकार महर्षी कै. वाय. बी. चौगुले हे अष्टपैलू व्यक्तीमत्व हेते. त्यांनी शिक्षण, सहकार, राजकारण तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा ठसा पुढे चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळळी यांनी जांबोटी येथे आयोजित शोसभेत बोलताना केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी जांबोटी विभाग जि. पं. सदस्य जयराम देसाई होते.
नवहिंदचे संस्थापक कै. वाय. बी. चौगुले यांच्या निधनानिमित्त बुधवारी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात विविध पतसंस्था तसेच माजी विद्यार्थी संघटना व वनदेवी पतसंसथा तसेच माजी विद्यार्थी संघटना व वनदेवी प्रबोधिनीच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जांबोटी हायस्कूलचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी प्रास्ताविक करुन वाय. बी. चौगुले सरांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर जांबोटी विभाग जि. पं. सदस्य जयराम देसाई, विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळळी यांच्या हस्ते कै. वाय. बी. चौगुले सरांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जांबोटी सीआरपी प्रमुख रमेश गावडे, अतिवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. वाय. पाटील, शिवाजी विद्यालय येळळूरचे शिक्षक एम. बी. बाचीकर, माजी मुख्याध्यापक एस. जी. शिंदे, हनुमान सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथ डिचोलकर, पत्रकार हणमंत जगताप, कणकुंबी माउली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर, जयराम देसाई यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
यावेळी माजी ग्रा. पं. सदस्य दत्ता घाडी, हिंडलगा हायस्कूलचे शिक्षक आर. एम. तरळे, राकसकोप हायस्कूलचे शिक्षक राजू इंगळे, अरुण देवळी, भारतीय जवान सुनिल देसाई, जांबोटी हायस्कूलचे महेश साबळे, तुकाराम सडेकर, दिनकर पाटील, सिद्धारुढ पाटील, नवहिंदचे कर्मचारी सिद्धोजी लांबोर यांच्यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी, विविध पत संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.