शासन व युजीसी आदेशाचे पालन करीत महाविद्यालये सुरू
प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवारी महाविद्यालयीन युवक युवतींचे कॉलेजच्या प्रांगणात आगमन झाले. लॉकडाऊनच्या काळात कामाच्या निमित्ताने भेटणारे युवक युवती एकमेकांना प्रत्यक्ष भेटल्याने आनंदून गेले होते. सकाळी 7 वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांची पावले कॉलेजकडे वळू लागली होती. त्यांगी वर्गात बसून प्रत्यक्ष अध्ययन केले. वर्ग संपल्यानंतरही विद्यार्थी बराच काळ कॉलेजच्या प्रांगणात थांबून मित्र-मैत्रिणींशी हितगुज करीत होते. त्यामुळे कॉलेज परिसर विद्यार्थ्यांनी फुलुन गेला होता.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर युजीसी व शासन आदेशातील सूचनांचे पालन करीत महाविद्यालये सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझेशन, याची सक्ती केली होती. स्क्रिनिंग तपासणी करूनच विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले. रोल नंबरनुसार 50 टक्के विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावली. एक दिवसाआड एक कॉलेजमध्ये उपस्थित राहायचे आहे. प्रत्यक्ष शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणापासून सुटका झाल्याची भावना व्यक्त केल्या. बारावीनंतर पहिल्यांदाच वरिष्ठ महाविद्यालयात आलेल्या पदवी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर वेगळा आनंद दिसत होता. जवळपास आठ महिन्यानंतर महाविद्यालयात मित्र-मैत्रिणींना भेटून लॉकडाऊन काळातील गमती-जमती सांगण्यात विद्यार्थी रमले होते. एकंदरीतच महाविद्यालयात आनंददायी वातावरण होते.
तीन तास प्रत्यक्ष अध्ययन
– प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण (शहाजी कॉलेज)
शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू झाल्याने प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होता. शासन व युजीसीच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत विद्यार्थ्यांचे ग्रुप करून दोन टप्यात तीन तास विद्यार्थ्यांना अध्यापन केले जात आहे. प्राध्यापकांची संख्या कमी आहे, त्यामुळे शासनाने त्वरीत सीएचबी प्राध्यापकांची नियुक्ती करावी.