प्रतिनिधी /सांगे
सतत पडणाऱया पावसामुळे सांगेतील भाटी येथील कोंगारे येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. घरापर्यंत वाहन घेऊन जायला मिळत नाही. येथे पंचायतीने डांबरी रस्ता केला आहे, पण साकव बांधलेला नाही. त्यामुळे दरवषी पावसाळय़ात येथील लोकांचे हाल होत असतात. सध्या भरपूर पाऊस पडत असल्याने येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोंगारे येथील या लोकांची समस्या खूपच गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी आमदार प्रसाद गावकर यांनी भाटीचे सरपंच उदय नाईक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहा. अभियंता दयानंद नाडकर्णी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी तेथील महिलांनी आमदारांपाशी आपली कैफियत मांडली होती. यावेळी आमदारांनी दोन पाईप टाकून तात्पुरती व्यवस्था करतो असे सांगितले होते. पण अद्याप पाईप न टाकल्याने रस्त्यावरून पाणी वाहून जात असल्याने लोकांना ये-जा करायला मिळत नाही.
दुसऱया बाजूने अन्य एका रस्त्याचे पंचायतीने डांबरीकरण केले असले, तरी तोही अर्धवट स्थितीत आहे. तेथेही पाईप टाकले असले, तरी पाण्याचा प्रवाह वाढला की, रस्त्यावरून पाणी वाहून जाते. तीन वर्षे होत आली, पण रस्ता तयार करून देतो असे सांगूनही अद्याप रस्ता झालेला नाही असे त्यावेळी महिलांनी बोलून दाखविले. कोविडमुळे सर्व काही ठप्प पडले होते. फायली हलत नव्हत्या. त्यामुळे उशीर झाला, असे आमदार गावकर यांनी सांगितले. पंचायतीला सरकारकडून मिळणाऱया निधीतून या ठिकाणी साकव बांधण्यास घेतला असून निविदा काढण्यात आली आहे. पावसाळय़ानंतर काम सुरू होईल. थोडी कळ सोसा, असे आमदार गावकर यांनी यावेळी उपस्थित महिला ग्रामस्थांना सांगितले.