गोडोली / प्रतिनिधी :
कोट्यवधी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना करून पुरेसा, शुद्ध, नियमित पाणी पुरवठा करण्यात अपयश आलेल्या कोंडवे (सातारा) गावात गेले 8 दिवस अति गढूळ पाणी पुरवठा होत आहे. कोणतीही शुध्दीकरणाची प्रक्रिया न करता थेट अति गढूळ पाणी पुरवठा करून कोंडवे ग्रामपंचायत नागरिकांच्या आयुष्याचा दोर कमकुवत करत असल्याचे उघड झाले आहे.
खासदार, आमदारांचे विशेष प्रेम असलेल्या या गावात अति गढूळ पाणी पुरवठा होत असून याबाबत प्रशासनाने ग्रामपंचायतीवर कारवाईचा दंडूका फिरवावा, अशी मागणी नागरिकांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.गावात पाणी पुरवठा योजनेची आधीच वाट लागली आता त्यात अति गढूळ पाणी पुरवठा होऊ लागला आहे. गेले 8 दिवस हा प्रकार होत असताना ना ग्रामपंचायतीने ना प्रशासनाने दखल घेतली. मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.