वार्ताहर /राजापूर :
राजापूर नगर परिषदेकडे वारंवार मागणी करूनही पाणी पुरवठा लाईनच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळय़ातही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संतप्त झालेल्या कोंढेतड येथील नागरिकांना मंगळवारी नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी यांना घेराव घातला. यावेळी येत्या 2 दिवसांमध्ये पाईपलाईनचे काम सुरू होईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी दिली.
शहरातील कोंढेतड परिसराला नगर परिषदेकडून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यातच, नळपाणी योजनेचेही काम रखडल्याने त्याचा फटका लोकांना सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही नळपाणी योजनेचे काम मार्गी लागत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कोंढेतड येथील महिलांनी आज माजी नगराध्यक्ष कल्याणी रहाटे यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेवर धडक देत नगराध्यक्षांना घेराव घातला. यावेळी प्रतिक्षा मांजरेकर, रोहीणी आडविलकर, दिपीका रहाटे, रसिका कुर्ले, सुप्रिया कुर्ले, सुरेखा चव्हाण, हेमंत चव्हाण, राजेंद्र साळवी, पालिकेतील सेनेचे विरोधी गटनेते विनय गुरव, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर यांच्यासह मोठय़ा संख्येने कोंढेतडच्या महिला उपस्थित होत्या.
कोंढेतड नळपाणी योजना व्हावी म्हणून कोंढेतडवासियांनी यापूर्वी नगर पालिककेडे निवेदने दिली आहेत. त्याप्रमाणे नळपाणी योजनेचे काम सुरू असून त्यामध्ये टाकीचे काम झाले आहे. मात्र, पाईपलाईनचे काम 2 वर्षापासून रखडले आहे. नळपाणी योजनेचे काम पूर्ण करण्याचे प्रशासन केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण कधी होणार? आणि लोकांना सुरळीत पाणी पुरवठा कधी होणार, असा प्रश्न यावेळी कोंढतवासियांनी उपस्थित केला. नळपाणी योजनेचे रखडलेले तातडीने सुरू होवून लोकांना नियमितपणे सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणीही यावेळी महिलांनी केली. यावेळी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी नळपाणी योजनेचे काम सुरू असून टाकीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या 2 दिवसांमध्ये पाईपलाईनचे काम सुरू होवून लोकांना सुरळीत पाणी पुरवठा होईल, असे आश्वासन दिले.