प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय. यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर रो-रो व मालगाडीच्या बरोबरच स्पेशल पार्सल ट्रेन चालवल्या जात आहेत. याच स्पेशल पार्सल ट्रेनमधून केरळमधून बनाना चिप्स कोकणात दाखल झाल्या. तर कोकणातुन ’हापूस’ आंबा अहमदाबादकडे रवाना झाला आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती असताना कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय. कोकण रेल्वेच्या मार्गावरील स्पेशल पार्सल ट्रेन गुरुवार 23 एप्रिल रोजी कोकणात दाखल झाली. या गाडीतून केरळमधून आलेल्या बनाना चिप्स कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरवण्यात आल्या आहेत. रत्नागिरीत बनाना वेफर्सचे 50 बॉक्स उतरवण्यात आले. याचबरोबर उड्डपी येथून मडगाव येथे तीन टन माल उतरवला गेला.
लॉकडाऊनच्या काळात कोकणातील हापुस आंबा वाहतुकीसाठी ही स्पेशल पार्सल ट्रेन सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. तिरूनतंतरपूरम येथून निघालेली ही पार्सल ट्रेन गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. या पार्सल ट्रेनमधून रत्नगिरीचा हापूस आंबा चढवण्यात आला. हा आंबा वसई, अहमदाबाद, राजकोट आदी शहरांमध्ये पाठवण्यात आला. रत्नागिरी स्थानकात हापूसच्या सुमारे 50 पेटय़ा या पार्सल ट्रेनमधून पाठवण्यात आल्या आहेत.
ही गाडी पनवेल, वसई, वापी, सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, ओखा अशी 15 तासांचा प्रवास करते. या गाडीला 5 पार्सल डबे आहेत. कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना अत्यावश्यक वस्तू व पार्सलसेवेसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा व्यावसायिकांना आंबा राज्यात व राज्याबाहेर पाठवण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे. रस्ते वाहतुकीपेक्षा निम्म्याहून कमी दरात आंब्याची वाहतूक कोकण रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. 27 एप्रिलपासून कोकण रेल्वेच्या मार्गावर दुसरी पार्सल ट्रेन धावणार आहे.