विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा
प्रतिनिधी/ दापोली
कोकणी माणूस स्वाभिमानी असून तो कोणापुढेही हात पसरणार नाही. मात्र शासनाने केवळ मदतीच्या घोषणा करून कोकणवासियांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत दिला.
चक्रीवादळ झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत दरेकर यांनी तिसऱयांदा दापोलीला भेट देत मदत कार्याचा आढावा घेतला. महसूल, कृषी, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य या विभागातील अधिकाऱयांसमवेत आढावा बैठक घेऊन निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीची माहिती घेतली.
कोकणविषयी आपल्याला संवेदना व आत्मीयता असल्यानेच पुन्हा या भागाला भेट दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांसाठी शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली असली तरी अजूनही अनेकांच्या खात्यात ही रक्कम जमाच झालेली नाही. त्यामुळे सरकारने केलेली मदतीची घोषणा कागदावरच राहील्याची स्थिती आहे. कोकणी माणूस हात पसरत नाही म्हणून त्याच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सर्व्हीस वायरचा भुर्दंड नको
निसर्ग चक्रीवादळामध्ये महावितरणच्या सर्व्हीस वायरचे नुकसान झाले असेल तेथे त्या बदलून द्याव्यात, त्याचा भुर्दंड ग्राहकांच्या माथी मारू नये अशा सूचना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. 13 जुलैपर्यंत दापोली व मंडणगड तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सदोष पंचानामे करणाऱयांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱयांकडे केली आहे. चक्रीवादळामध्ये अनेक बागांचे नुकसान झाले असून या बागा स्वच्छ करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत मजूर लावून या बागा स्वच्छ करण्याची गरज आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे तसेच वन राज्यमंत्री राठोड यांच्याकडे आपण याबाबतचा पाठपुरावा केला असून त्यानीं या कामास मान्यता दिली असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.
प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱयांच्या खात्यात शासन 50 हजार रुपये जमा करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र ती फसवीच ठरली आहे. आहे. शेतकऱयांच्या बांधापर्यंत खते व बियाणे देण्याच्या घोषणेचेही तेच झाले आहे. दापोली तालुक्यात 200 टन युरिया व 150 टन सुफलाची कमतरता असल्याचे अधिकाऱयांनीच सांगितले आहे. आता खत येणार कधी व त्याचा शेतीला उपयोग होणार कधी असा सवाल दरेकर यांनी केला.
परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरूच नये असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. पालकांकडे सध्या पैसेच नाहीत तर ते शुल्क कोठून भरणार असा सवालही त्यांनी केला. तसेच पालकमंत्र्यांनी या तालुक्यात ठाण मांडून बसले पाहिजे व शासकीय यंत्रणा हलवली पाहिजे होती. मात्र पालकमंत्र्यांनी एकदाच भेट दिल्याची टीका त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला आमदार प्रसाद लाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, जिल्हा चिटणीस श्रीराम इदाते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर आदी उपस्थित होते.