विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन,
प्रतिनिधी/ मंडणगड
समस्त कोकणवासीयांचा आवाज विधीमंडळात मांडून सरकारला धारेवर धरणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिले.
निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसलेल्या व मोठय़ाप्रमाणात नुकसान झालेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास व अन्य गावांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा फडणवीस यांनी शुक्रवारी केला. सकाळी दहा वाजता फडणवीस यांनी मंडणगड शहरातून वेळास, बाणकोटकडे प्रयाण केले व तेथील नुकसानीची पाहणी केली.
यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानीबाबत आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी शेतकऱयांनी सरकार करीत असलेली मदत अपुरी असल्याचे सांगत शासनाने आपल्या निर्णयात बदल करून भरीव निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केला. नुकसानग्रस्त कोकणातील गावांचा पुनर्विकास करावा, कर्जाचा बोजा कमी करुन सातबारे कोरे करावेत, पर्यटन व रोजगारास चालना द्यावी, शेती कर्जाची मर्यादा व मुदत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. यावर फडणवीस यांनी समस्त कोकणवासीयांचा आवाज विधीमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार विनय नातू, माजी आमदार बाळ माने, भाजपा तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे, माजी सभापती प्रिया दरिपकर, स्मिता जावकर आदी उपस्थित होते.