सिंधुदुर्ग जिल्हय़ातल्या कुडाळजवळ वसलेल्या पिंगुळी गावाला चित्रकथीच्या प्रयोगात्मक लोककलेचा जो वारसा लाभलेला आहे त्याचा विविधांगी अभ्यास मराठीतले सिद्धहस्त साहित्यिक आणि कविवर्य डॉ. महेश केळुसकर यांच्या अनघा प्रकाशन, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘चित्रकथी’ पुस्तकाने वाचकांसमोर प्रकाशात आणलेला आहे. कविता, कादंबरी, कथा, विनोदी गद्य, ललित गद्य, बालवाङ्मय, संपादन आदी क्षेत्रात सकसपूर्ण लेखन करणाऱया डॉ. केळुसकर यांचा ज्या कोकणात जन्म झाला त्या प्रदेशातला लोकसंस्कृतीचा वैविध्यपूर्ण आणि समृद्ध असा जो वारसा लाभलेला आहे त्याचा संशोधनात्मक दृष्टीने ऊहापोह त्यांनी दशावतार, चित्रकथी आणि ललितविषयक पुस्तकातून केलेला आहे. मालवणी मुलखातल्या लोकजीवन, लोककला, लोकविश्वास यांचा आस्वाद विद्यार्थीदशेपासून घेतला आणि एका पारंपरिक प्रयोगात्मक लोककलेसंदर्भातली निरीक्षणे आणि बाराकावे टिपून त्यांचा तौलनिक पद्धतीने अभ्यास केला त्याचे विलोभनीय दर्शन त्यांच्या ‘चित्रकथी’ पुस्तकातून पहायला मिळते.
पिढय़ा न् पिढय़ा पिंगुळीत वास्तव्यास असणाऱया ठाकर समाजाने चित्रकथी, कळसूत्री आणि छाया बाहुल्या या तीन प्रमुख लोककलांचे संगोपन करून भगवद्भक्ती आणि धर्मविषयक जीवनमूल्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. पिंगुळीच्या भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचा वेध घेत ज्या ठाकर समाजाने चित्रकथीचा वारसा प्रतिकूल परिस्थितीत टिकवून ठेवला त्यांचा लोकधर्म आणि दैवते, उपजीविकेसाठी केली जाणारी धडपड, त्यांची बोली, तत्कालीन राजाश्रय या विषयांचा वेध घेत लेखकाने सद्यस्थितीतल्या चित्रकथीविषयी प्रतिपादन केलेले आहे. ज्या चित्रकथीच्या सादरीकरणात चित्रे महत्त्वाची आहेत त्या शैलीवरती जे प्रभाव जाणवलेले आहेत त्यांची नोंद उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण देऊन तन्मयतेने घेतलेली आहे. संत एकनाथ महाराजांच्या ‘भावार्थ रामायणा’चा प्रभाव पडून ही लोककला कशी समृद्ध आणि सुरस होऊन तत्कालीन समाजाचे प्रबोधन, मनोरंजन करण्यास कारणीभूत ठरली त्याचे विवेचन लेखकाने केलेले आहे. भारतीय संस्कृतीने दुष्टांचा संहार करून सत्यधर्माची प्रतिष्ठापना करून सज्जनाच्या रक्षणाचा जो पुरस्कार केलेला आहे त्याविषयीची चर्चा या पुस्तकातून करण्यात आलेली आहे. पौराणिक ते ऐतिहासिक कालखंडात कळसूत्री बाहुल्याचे स्वरुप पिंगुळी व्यतिरिक्त देशाच्या अन्य प्रांतात आणि संस्कृतीत कसे आहे. कळसूत्रीला समानार्थी संज्ञांचा उद्गम आणि इतिहास याची चर्चाही केलेली आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी ठिकाणी छाया बाहुल्यांच्या खेळाचे स्वरुप कसे आहे, त्यात कोणती समान सूत्रे आहेत या विषयीची तौलनिक पद्धतीने मांडणी केल्याकारणाने मराठी वाचकांना चित्रकथीच्या सुंदर आणि वैशिष्टय़पूर्ण संचिताचे दर्शन तृप्त करणारे असेच आहे. गोवा, कर्नाटकातल्या कारवार आणि कोकणात आपल्या लोककलांचे सादरीकरण व्हावे या हेतूने ठाकर समाजाचा एकेकाळी संचार असायचा. गोव्यात पेडणे ते सत्तरीपर्यंतच्या धालोत्सवाच्या लोकगीतात पिंगुळीतल्या या लोककलाकारांचा उल्लेख आढळतो. याला एकेकाळी इथल्या समाजाशी त्यांचे पूर्वापार असलेले स्नेहबंध कारणीभूत होते. मासेमारी करणे, मासे सुकवून विकणे, गृहोपयोगी वस्तूंची विक्री करत आपला उदरनिर्वाह करणाऱया या समाजाने पिढय़ा न् पिढय़ा लाभलेला प्रयोगात्मक चित्रकथी लोककलेच्या वारशाचे जतन केलेले आहे, त्याविषयीची लेखकाच्या हृदयातली भावस्पंदने या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आलेली आहेत.
डॉ. महेश केळुसकर यांनी मराठी काव्यविश्वात आपल्या प्रतिभेचा आणि कर्तृत्वाचा उमटवलेला ठसा सर्वश्रुत असून ज्या प्रदेशात आपला जन्म झाला, बालपणातले दिवस नानाविध लोककलांचे दर्शन घेत रम्य झाले त्या विषयीचा सार्थ अभिमान त्यांच्या संशोधनात्मक ‘चित्रकथी’च्या लिखाणातून जागोजागी दृष्टीस पडलेला आहे.
आज मानवी जीवनात मनोरंजन आणि प्रबोधनाची नवनवीन माध्यमे उपलब्ध झालेली असल्याने त्याचे चटके चित्रकथीच्या प्रयोगात्मक लोककलेचा वारसा जतन करून ठेवलेल्या कलाकारांना सोसावे लागलेले आहेत. त्याविषयीची जी प्रचिती लेखकाला आलेली आहे त्याचा प्रत्यय वाचकांना या पुस्तकातून येतो. लोकसंस्कृतीच्या संवर्धनाच्या पालखीचे भोई बनलेल्या ठाकर समाजाने ज्या आत्मियतेने आणि अमाप श्रद्धेने चित्रकथीचा वसा अव्याहतपणे टिकविलेला आहे त्याचे दर्शन तितक्याच ताकदीने लेखकाने आपल्या संशोधनात्मक साहित्यकृतीतून वाचकांसमोर समूर्त केलेले आहे. सर्वसामान्य अशा कष्टकरी समाजात देवतांचे स्थान महत्त्वाचे असून आपल्या प्रपंचाचा गाडा सुरळीतपणे चालविण्यासाठी या शक्तीचे योगदान असल्याची श्रद्धा त्यांच्यात पूर्वापार असल्याकारणाने ठाकर लोककलाकार देवाला प्रसन्न करण्यासाठी ‘चित्रकथी’चा खेळ सादर करतात. लोकधर्मावरच्या या श्रद्धेने ही लोककला समाज त्याचप्रमाणे कलाप्रेमी राजाश्रयाच्या आधारे फुलली, फळली.
भारतीय लोकप्रधान महाकाव्यातल्या कथासूत्रावर आधारित लघुचित्रे रंगविण्याची परंपरा पैठणाला बहरली आणि तेथून ही कला पिंगुळीत ठाकर समाजात रुळली. चित्रकथीसाठी जुन्या पोथ्या अधिक सजविलेल्या असून त्यातील आकृत्या अलंकृत केलेल्या आहेत आणि त्यांच्यातल्या रचनेतील लक्षणीय अशा कल्पकतेचे दर्शन घडते. कल्पनाबंधातील निश्चितता, सर्वोत्कृष्ट चित्रांची मांडणी आणि मर्यादित रंगछटाद्वारे सकारात्मक चित्रण ही लोकशैलीची वैशिष्टय़े चित्रकथीच्या चित्रशैलीत अनुभवायला मिळते, हे लेखकाने केलेले प्रतिपादन आजसुद्धा या कलेचा वारसा पिंगुळीत प्रत्यक्षदर्शी प्रचितीस येतो.
कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात बाहुल्या जशा रंगमंचावर हालचाली करतात त्याच्याशी साम्य दर्शविणाऱया हालचाली या चित्रकथीमधील मानवीकृतीत आढळतात. चित्रातून वेगवेगळे प्रसंगी अगदी जवळून पाहिल्यासारखे चित्रित केल्याकारणाने त्यांचा प्रभाव प्रेक्षकांवरती पडतो आणि ते कथासुत्राद्वारे कथन केल्या जाणाऱया भावविश्वात रममाण होऊन जातात. चित्रकथीच्या परंपरेचे जतन ठाकरांनी कष्टपूर्वक एकेकाळी करून इथल्या समाजात प्रतिकूल कालखंडात जीवनमूल्यांवरची निष्ठा आणि धर्मश्रद्धा वृद्धिंगत करण्यात महत्त्चाची भूमिका बजावली होती. नीतिबोध, व्यवहारी शहाणपण आणि धार्मिकता ही मनोरंजनाच्या वेष्टनातून ग्रामवासियांपर्यंत पोचविण्यात चित्रकथीचे कार्य लेखकाने अत्यंत प्रवाही भाषेतून आणि प्रत्यक्षदर्शी निरीक्षणे, तौलनिक अभ्यासाच्या माध्यमातून अधोरेखित केल्याकारणाने लोकसाहित्यातल्या नव्या दिशा शोधणाऱयांसाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त ठरणार आहे.
राजेंद्र पां. केरकर