प्रतिनिधी/ रत्नागिरी
शेतीबद्दलच्या अनिच्छिततेची, शेतीबद्दलचं आकर्षण नव्या पिढीला राहिलेलं नाही हे सर्वश्रुत आहे. शेती हा व्यवसाय बेभरवशाचा, पूर्णतः निसर्गाधिन झालेला आहे. तो एक प्रकारचा जुगारच आहे. हा जुगारही वर्षानुवर्षे हरायचीच वेळ येत असेल तर शेतकऱयांची नवी पिढी नवा मार्ग चोखळणार हे उघडच आहे. कोकणातील शेतीत रुजलेल्या सुमारे 30-40 वर्षांपूर्वीच्या जुन्या संस्कृतीचे निसर्ग चित्र रेखाटन करून नव्या पिढीला अवगत करण्याचा संदेश रत्नागिरी तालुक्यातील तरवळ गावचे आर्टीस्ट व कलाशिक्षक अर्जून माचिवले यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने इकोप्रेंडली देखाव्यातून दिला आहे.
“शेती आणि शेतकरी टिकला पाहिजे’’ अशी व्यापक चळवळ सुरू करण्याची आता नक्कीच गरज निर्माण झालीय. नागरिकरण आणि औद्योगिकरणाच्या वाढत्या वेगाने आणखी पंचवीस-50 वर्षांनी जिल्हयात शेती शिल्लक राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण कोकणात हेच चित्र दिसून येत आहे. शेतीला उद्योगाचा नवा पर्याय आला. वाढते शहरीकरण, कारखानदारी शेतीवर अवलंबून असणाऱयांच्या सख्येतही लक्षणीय घट झाल्याचे आज चित्र आहे.
ग्रामीण भागात अनेकांना शेती बोजा वाटायली लागली. जमिनीला चांगली किंमत मिळते म्हणून कित्येकांनी आपली शेती विकून टाकलीय. एकीकडे शेतीतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणार उत्पन्न याचीं तोंडमिळवणी होत नाही. अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. यातून शेतीमुक्त होण्याचे पर्याय अनेकांनी शोधले आहेत. कोकणातील पूर्वीची शेती व शेतकरीही केवळ गुगलवर सर्च करूनच पहावा लागेल अशी आता शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे या गणेशोत्सवात कोकणातील कालबाहय़ शेतीचे चित्र तरवळ (माचिवलेवाडी) येथील आर्टिस्ट व कला शिक्षक अर्जुन धाकु माचिवले आपल्या घरी इकोप्रेंडली देखाव्याच्या रुपातून मांडले आहे. लॉकडाऊन असल्याने मुंबईतून गावी आलेले अर्जून माचिवले आपल्या कलेल्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, तरूणांनाही त्या कलेचे धडे देत आहेत. आता तर आपल्या घरी आपल्या कलेतून कोकणच्या शेतीचे निसर्ग रेखाटन व जुन्या कृषी साधनांवर आधारीत गत वैभव साकारले आहे. त्यात लाकडी नांगर, दळणासाठी वापरले जाणारे जात्ये, घोंगडी, आकडी-कोयता, परडी, सुप, मुसळ, कंदील, दिवा आदी साहित्यांची मांडणी केली आहे. कोंकणातील 30 ते 40 वर्षापूर्वीची संकृती आताच्या नव्या पिढीला पुन्हा अवगत करून देण्याचा प्रयास केला आहे.