मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणे आणखीन दोन मार्गांचा विकास
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी, मुंबई-सिंधुदूर्ग आणखी जवळ आणण्यासाठी कोस्टल हायवे रुंदीकरण व ग्रीन फिल्ड रस्ता या दोन महामार्गाचे काम ‘एमएसआरडीसी’ च्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यावेळी विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरी पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भुमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी चांगले रस्ते, कनेक्टिव्हीटीची गरज असते. ज्या ठिकाणी चांगले रस्ते असतात त्या ठिकाणचा विकासदेखील वेगाने होत असतो. कोकणामधील पर्यटन वाढीसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. राज्यात समृध्दी महामार्ग राबवला जात आहे. 700 कि.मी.चा हा महामार्ग आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा महामार्ग खुला केला जाणार आहे. पुढच्या वर्षी उर्वरित मुंबई-ठाणे हा महामार्ग जोडणार आहे. समृद्ध महामार्गाबाबत अनेकांनी वाद घातला, विरोध झाला. मात्र या मार्गाने त्या भागाचा प्रचंड विकास साधला आहे. ज्या गावांची कुठेच ओळख नव्हती. त्या गावांमध्ये आयात, आयटीपार्क होऊ लागले आहेत.
त्यामुळे मुंबई-गोवा हा ग्रीनफिल्ड मार्ग देखील कोकणाला समृद्धी देणारा ठरणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई-गोवा हा देखील ऐतहासिक महामार्ग आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे आता आणखी दोन मार्ग कोकणात होणार आहेत. त्यामध्ये ‘कोस्टल हायवे’ चा समावेश आहे. त्याचे रुंदीकरण करून समुद्र समुद्र किनाऱयावरून हा मार्ग येणार आहे. तो अनेक खाडय़ा, जेटींनी तो जोडला जाणार आहे. पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. तर दुसरा ‘ग्रीनफिल्ड’ मार्ग देखील होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणे हा पर्यायी मार्ग असेल असे शिंदे यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या मार्गाची निर्मिती केली जात आहे. त्याला आता मिळाली आहे. या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच त्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे रत्नागिरीकर अवघ्या साडे तीन तासांमध्ये मुंबईला जाऊ शकणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.