प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या आठवडय़ात जिल्हय़ात हाहाःकार उडवून दिल्यानंतर पावसाचा जोर 2 दिवसांपासून ओसरलेला आहे. घटकेत उन तर घटकेत पावसाच्या सरी असे वातावरण सोमवारी दिसून आले. पण हवामान विभागाने 27 ते 28 जुलै रोजी मुसळधार तर 29 ते 30 जुलै रोजी दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदूर्गात मुसळधार ते अति मुसळधारचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली आहे.
संपूर्ण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याने महापूराने गावे, शहरे जलमय झाली. मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळून जिवीतहानी झाली. त्यामुळे नागरिकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागलेले आहे. वित्तहानीची तर मोजदाद नसल्याची स्थिती बनलेली आहे. अजूनही या महाप्रलयानंतर जिल्हय़ातील जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. महापूरानंतर चिपळूण, खेड आदी ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे. या झालेल्या अतिवृष्टीनंतर गेल्या दोन दिवसांपासून जिल्हय़ात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे साऱयानीच सुटकेचा निःश्वास टाकलेला आहे.
गेल्या दोन दिवसांच्या उघडीपीनंतर आता हवामान विभागाने दक्षिण कोकणात पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. 27 व 28 जुलै रोजी रत्नागिरीसह सिंधुदूर्ग जिल्ह्य़ात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 29 व 30 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर वेगवान वारेही वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर या वाऱयांचा वेग ताशी 40 ते 45 कि.मी व त्यापेक्षा 70 कि.मी पर्यंत राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील नागरिकांनी सतर्क व खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.