दापोलीतील करंजाळी येथे काळ्या तांदळाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी
मनोज पवार / दापोली
जगात सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या व खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडून देखील मोठी मागणी असणाऱ्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोलीत शेती करण्यात आली आहे. यामुळे कोकणातील भात शेतीचे अर्थकारण पूर्णपणे बदलून कोकणातील भात शेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सूर्वे या सव्वीस वर्षांच्या युवकांने आपल्या शेतात या काळ्या तांदळाची शेती केली आहे. अभिषेक हा दापोली तालुक्यातील करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. मात्र आता तो आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन दापोलीत आला आहे. दापोलीत स्थायिक झाल्यावर त्यांने आपली वडिलोपार्जित असणारी शेती करण्याचा निर्णय घेतला व आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली.
अभिजीत अभिषेक सुर्वे हा मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी आहे. यामध्ये त्यांना सर्वप्रथम काळ्या तांदळाची माहिती मिळाली. त्यावेळी लॉकडाऊनचा काळ होता. त्याने पत्रव्यवहार करून काळ्या तांदळाचे बी-बियाणे मिळवले. आज अभिषेकच्या दारात काळ या तांदळाची भात शेती चांगली तरारली आहे.
तांदूळ म्हटलं की पहिला आठवतो तो भात. भारतात भाताचे अनेक प्रकार आपण पाहतो. उकडीचे तांदूळ, गावठी तांदूळ, बासमती, सुवर्णा, कोलम असे अनेक प्रकारचे तांदूळ कोकणात उत्पादित केले जातात. आता अभिषेक सारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी काळे तांदळाची शेती करायला सुरुवात केली आहे.
देशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. 150 दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय शरीर स्वस्त व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
कोकणामध्ये भातशेती ही तुकड्या तुकड्यामध्ये केली जाते. कोकणामध्ये भात शेतीसाठी असणाऱ्या अल्प जागेमध्ये तेवढ्याच श्रमामध्ये भात उत्पादक शेतकर्यांना दहापट अधिक नफा देणारे हे बियाणे आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या भात शेती तील काही चोंढ्यामध्ये पुढील वर्षापासून काळ्या तांदळाची शेती केल्यास ते कोकणाला वरदान ठरेल.