वार्ताहर/ राजापूर
कोकणातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काथ्या उद्योगावर आधारीत ‘कॉयर क्लस्टर’ उभारण्याची मागणी भाजपचे माजी आमदार व महाराष्ट्र सचिव प्रमोद जठार यांनी राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्हय़ांमध्ये जवळपास पाच क्लस्टर उभारण्याचा मानस असून या माध्यमातून सुमारे अडीज हजार महिलांना रोजगार मिळणार असल्याचे श्री.जठार यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱया कोकणातील सर्व समस्या सोडविण्यासाठी माजी आमदार जठार यांनी कोकण ते दिल्ली असा थेट भेट कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार त्यांनी नुकतीच दिल्ली येथे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्यसभा खासदार तसेच कॉयर बोर्डाचे सदस्य डॉ.विनय सहस्त्रबुध्दे यांची दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेसाठी सिंधुदुर्ग, दक्षिण रत्नागिरी, उत्तर रत्नागिरी व रायगड अशा जिल्हय़ांमध्ये कॉयर क्लस्टर उभारण्याबाबत चर्चा केली.
पालघर ते सिंधुदुर्ग या दरम्यान दरवर्षी साधारण 25 कोटी नारळाचे उत्पन्न घेतले जाते. या नारळांच्या सोडणांवर चालणारे छोटे उद्योग सिंधुदुर्ग जिल्हय़ात काही प्रमाणात वगळता अन्य जिल्हय़ांमध्ये नाहीत. नारळाच्या सोडणांपासून कॉयर तयार करणे, त्यावर प्रोसेसिंग करून तागा काढणे, तसेच यामध्ये जो कचरा निघतो त्याचा कोकोपीट म्हणून नर्सरीमध्ये वापर केला जातो. मातीमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी हे कोकोपीठ अतिशय फायदेशीर ठरते. तसेच काथ्याचा उपयोग पाय पुसणे, बेड, व शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी होतो. आता तर रस्तेबांधणीसाठीही कॉयरचा वापर केला जात आहे.
त्यामुळे कोकणात अशी कॉयर क्लस्टर झाल्यास येथील महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्हय़ात 5 कॉयर क्लस्टर उभारण्याची मागणी जठार यांनी केली असून एका क्लस्टरमध्ये किमान 500 महिला अशा पाच क्लस्टरच्या माध्यमातून कोकणामध्ये 2500 महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या उद्योगांसाठी कोकणातील महिलांना आवश्यक असणारे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे जठार यांनी सांगितले. दरम्यान खासदार डॉ.सहस्त्रबुध्द यांनी कोकण विकासाच्या या उपक्रमात हातभार लावण्याचे आश्वासन देताना व लागणारी सर्व मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याचे मान्य केले. तसेच या विकासकामात कोकणच्या जनतेचे पाऊल आत्मनिर्भर कोकणातून आत्मनिर्भर भारत या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पापर्यंत पोहोचेल असा विश्वासही व्यक्त केल्याचे श्री.जठार यांनी सांगितले.