प्रतिनिधी/ फोंडा
कोकणी व हिंदी भाषेचे अत्यंत जवळचे नाते आहे. मुळात या दोन्ही भाषांची लिपी ही देवनागरी असल्याने हिंदी भाषिकांना ती जाणून घेणे सोपे होते. गोव्यासह इतर प्रांतातील साठ लाखाहून अधिक लोक कोकणी भाषा बोलतात. हिंदी भाषकांना कोकणी प्रांताविषयी नेहमीच आपुलकी व जिव्हाळा राहिला आहे. हे संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी लवकरच प्रकाशित होणारा हिंदी-कोकणी शब्दार्थ वाक्यकोष महत्त्वाचा ठरेल, असे उद्गार केंद्रीय हिंदी संस्थान आग्राचे संचालक डॉ. नंदकिशोर पांडे यांनी काढले.
फर्मागुडी येथील पीईएस महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकणी व हिंदी साहित्याचा परस्पर संबंध’ या विषयावरील दोन दिवशीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पीईएस संस्थेचे अध्यक्ष आमदार रवी नाईक तर खास निमंत्रित म्हणून राजभाषा संचालनालयाचे उपसंचालक अनिल सामंत, पीईएसचे प्राचार्य डॉ. विकास पिसुर्लेकर, परिसंवादाचे समन्वयक डॉ. भूषण भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय हिंदी संस्थानतर्फे हिंदी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी सुरु असलेल्या कार्याची डॉ. पांडे यांनी यावेळी माहिती दिली. उत्तरपूर्व भागातील नागालॅण्ड व अरुणाचल प्रदेशमध्ये चार हजार शिक्षकांना हिंदीचे प्रशिक्षण देतानाच दक्षिण भारतात आजवर तीस हजारहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित केल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्याने कला व संगीत क्षेत्राला मोठे योगदान दिले असून हिंदी व कोकणी भाषेमधील दुवा अधिक दृढ होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दीपप्रज्वलीत करून डॉ. नंदकिशोर पांडे व इतर मान्यवरांच्याहस्ते परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले.
एक राष्ट्र एक भाषा ही संकल्पना देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्याचे आमदार रवी नाईक यांनी नमूद केले. हिंदी राष्ट्रभाषेचा प्रसार प्रादेशिकतेच्या आग्रहामुळे खुंटला असे सांगून हिंदी चित्रपट सृष्टीमुळे गोव्यावर या भाषेचा प्रभाव राहिल्याचे ते म्हणाले. भाषा हे संपर्काचे माध्यम असल्याने देशातील विविध प्रांत व जनता भाषेंच्या आदनप्रदानातून जोडली जावीत, असे सांगून परिसंवादत सहभागी होणाऱया प्रतिनिधींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
शासकीय पातळीवर कोकणीचा विकास होण्यासाठी हिंदीचे सहकार्य आवश्यक असल्याचे अनिल सामंत यांनी सांगितले. मराठी व इतर देशी भाषांचा परस्पर सहयोग त्यासाठी गरजेचा आहे. अशा उपक्रमामधून त्यांना चालना मिळत आहे. प्रा. भूषण भावे यांनी आपल्या बीज भाषणात कोकणी व हिंदी भाषेच्या परस्पर संबंधांचा मागोवा घेताना, गोव्यात हिंदी भाषा बोलण्याची परंपरा खूप वर्षांपासून असल्याचे सांगितले. गोवा हा बिगर हिंदी प्रदेश असा समज असला तरी कोकणी व हिंदीतील बऱयाच शब्दांमध्ये साम्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले. गोमंतकीयांनी हिंदीबरोबरच तब्बल सोळा भाषांमध्ये लेखन केल्याचा संदर्भ देऊन गोवा हे बहुभाषिक राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही भाषांतील साहित्यिक आदानप्रदान त्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणी संस्कृतीचा हिंदी चित्रपट सृष्टीवर मोठा प्रभाव असल्याचे सांगताना साठ व सत्तरीच्या दशकात अनेक गोमंतकीय कलाकारांनी चित्रपट सृष्टीचे योगदान दिले आहे. ऍन्थोनी गोन्साल्वीस सारख्य़ा कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीचे संगीत अधिक समृद्ध केले. बॉबीसारख्या चित्रपटातून गोमंतकीय संस्कृती व व्यक्तिरेखांचे दर्शन घडल्याचा उल्लेखही त्यांनी केला. हिंदी व कोकणी भाषेमधील परस्पर संबंधाची उकल करताना हिंदी चित्रपट सृष्टीपासून बाल साहित्य व अन्य विषय या परिसंवादात मांडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी भाषेच्या प्रसारासाठी योगदान दिलेले गोमंतकीय लेखक स्व. अनंत राम भट व मोहनदास सुर्लकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अनंत भट यांचे चिरंजीव अनिल भट व स्नुषा स्वाती भट यांनी रवी नाईक यांच्याहस्ते हा सन्मान स्विकारला. मोहनदास सुर्लकर यांनाही त्यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले.
स्वागत प्राचार्य विकास पिसुर्लेकर यांनी तर प्रा. संदीप लोटलीकर यांनी सूत्रसंचालन केले.