प्रतिनिधी/ रत्नागिरी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ ओरिसा-आंध्रप्रदेशमध्ये धडकल्यानंतर त्याचे पडसाद पश्चिम किनारपट्टीवर उमटू लागले आहेत. कोकण किनारपट्टीवर दोन दिवस वादळी वारे घोंघावणार आहेत. रत्नागिरी जिह्यात आज 28 व उद्या 29 सप्टेंबर रोजी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर मासेमारी ठप्प आहे. कापणीसाठी तयार असलेल्या भातशेतीवर संकटाची भीती व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून सोमवार 27 सप्टेंबर रोजी जिह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारचा इशारा देण्यात आलेला होता. या दिवशी सकाळपासूनच किनारपट्टीवर पावसाची छाया दाटलेली होती. †िदवसभरात विविध ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, मात्र रात्रीपर्यंत कोठेही अतिमुसळधार पावसाचे वृत्त नव्हते. गुलाब चक्रीवादळ रविवारी ओरिसा – आंध्रप्रदेशच्या किनारी भागात धडकल्यानंतर हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीला अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात विविध भागात 28 ते 29 सप्टेंबरदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण, गोवा किनारपट्टीवर या वादळाचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे समुद्रही खवळलेला राहणार आहे. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. त्यानुसार बहुतांश मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱयावर नांगरून ठेवल्या आहेत.
आज 28 सप्टेंबर रोजी जिह्यातील काही ठिकाणी वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह अतिमुसळधार तर उद्या 29 रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासनाने आपापल्या कार्यक्षेत्रात सावधानता व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. किनारपट्टीवर सोसाटयाचा वारादेखील वाहणार असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी असेही सांगण्यात आले आहे.
…