खेड
कोकण मार्गावरील रोहा-वीर मार्गादरम्यान 21 ऑगस्टपासून ट्रक दुहेरीकरणाच्या पायाभूत सुविधा सुधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कोकण मार्गावर आठवडाभराचा मेगाब्लॉक करण्यात आल्याने कोकण मार्गावरून धावणाऱया 16 रेल्वेगाडय़ा विलंबाने धावत होत्या. हा मेगाब्लॉक 30 ऑगस्टपासून संपुष्टात येणार आहे. यामुळे विलंबाने धावणाऱया रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक सोमवारपासून पूर्ववत होणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
या मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणाऱया 16 रेल्वेगाडय़ांसह अन्य रेल्वेगाडय़ा उशिराने धावत होत्या. रविवारीही मुंबईला जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस तब्बल 4 तास विलंबानेच धावत होती. यापूर्वीही रेल्वेगाडय़ा 2 ते 3 तास उशिराने धावत होत्या. कोकण मार्गावरून धावणाऱया तिरूअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस, जामनगर-तिरूनेलवेली, लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरूअनंतपुरम, हापा-मडगाव, तिरूअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस, जामनगर-तिरूनेलवेली, मडगाव-निजामुद्दीन, तिरूअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेगाडय़ांवर मेगाब्लॉकचा परिणाम झाला.
रोहा-वीर दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने कोकण मार्गावरील प्रवास वेगवान व सुखकर होणार आहे. या ठिकाणच्या दुपदरीकरणाच्या कामासह क्रॉसिंग स्थानकाचे कामही पूर्णत्वास गेले आहे. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ा वेगवान धावणार असून प्रवाशांच्या वेळेचीही बचत होणार आहे.