प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावरून धावणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर रविवारी तब्बल 3 तास विलंबाने धावल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. परतीच्या प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांमुळे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळल्याने काही प्रवासी माघारीही परतले. उशिराने दाखल झालेल्या पॅसेंजरमुळे प्रवाशांना मनस्तापाला समोर जावे लागले. रत्नागिरी स्थानकात ही गाडी धुण्यासाठी बराच वेळ थांबवण्यात आल्यामुळे विलंब झाल्याचे समजते.
शिमगोत्सव आटोपून चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून कोकण मार्गावरून धावणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ा हाऊसफुल धावत आहेत. रेल्वेगाडय़ांना उसळणाऱया गर्दीमुळे प्रवाशांना आल्यापावली माघारी परतावे लागत आहे, तर काही प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत मुंबई गाठत आहेत. यासाठी जादा आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. यामुळे खासगी वाहनांचा भावही वधारला आहे.
रविवारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर तब्बल 3 तास उशिराने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. काही प्रवाशांनी माघारी परतण्याला पसंती दिली, तर काही प्रवासी तासन्तास स्थानकातच तिष्ठत बसले. येथील रेल्वेस्थानकात सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी दाखल होणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर सकाळी 10 वा. दाखल झाली. ही पॅसेंजर स्थानकात दाखल होताच चाकरमान्यांची प्रवेश मिळवण्यासाठी झुंबड उडाली.
उन्हाळी सुट्टीसाठी सुरत-करमाळी साप्ताहिक स्पेशल धावणार
उन्हाळी सुट्टीच्या हंगामात कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांना प्रवाशांची उसळणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने 19 एप्रिल ते 7 जूनपर्यंत सुरत-करमाळी साप्ताहिक स्पेशल चालवण्यात येणार आहे. 17 डब्यांची ही स्पेशल वसईमार्गे धावेल. 09193/09194 क्रमांकाची सुरत-करमाळी स्पेशल दर मंगळवारी सुरत येथून सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटून दुसऱया दिवशी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी करमाळी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 20 एप्रिल ते 8 जूनपर्यंत दर बुधवारी धावणारी ही स्पेशल करमाळी येथून सकाळी 12 वाजून 30 मिनिटांनी सुटेल. दुसऱया दिवशी सकाळी 8 वा. सुरत येथे पोहचेल. या गाडीला भिवंडी, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.