प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या संकटानंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या मुंबई – करमाळी तेजस एक्सप्रेसला ब्रेक लागला होता. नाताळ सणासह नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबरपासून तेजस एक्सप्रेस सोमवार व बुधवार वगळता ५ दिवस धावणार असल्याने पर्यटक सुखावले आहेत. या पाठोपाठच मुंबई मंगळूर सुपरफास्ट स्पेशलही नियमितपणे धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
नाताळ सणासाठी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना गर्दी उसळत असते. कोरोना नियंत्रणात येत असल्याने कोकण मार्गावर आतापर्यंत ९ रेल्वेगाड्या धावत आहेत. यामध्ये ५ साप्ताहिक गाड्यांसह ४ नियमित गाड्यांचा समावेश आहे. या सर्वच गाड्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी आठवड्यातून ५ दिवस तेजस एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही एक्सप्रेस सकाळी ५.५० वाजता सुटून दुपारी २ वाजता करमाळीला पोहचेल. परतीच्या प्रवासात करमाळी येथून दुपारी २.४० वाजता सुटून रात्री ११.१५ वाजता मुंबईला पोहचेल. १२ डब्यांच्या या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
तेजस एक्सप्रेस पाठोपाठ मुंबई-मंगळूर सुपरफास्ट स्पेशलही २० डिसेंबरपासून नियमितपणे कोकण मार्गावर धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी रात्री १० वाजून २ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात मंगळूर येथून दुपारी २ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता मुंबई येथे पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, भटकळ, मुकांबिका रोड, बैदूर, कुंदापुरा, उडुपी, सुरतकळ आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.