प्रवाशांच्या आरोग्य सेवेसाठी महत्वपूर्ण योगदान
कोरोना काळात स्वच्छतेला दिले महत्व
अजय कांडर / कणकवली:
कोरोना काळात कोकण रेल्वेसह सर्वच वाहतूक यंत्रणा बंद होती. त्यामुळे कोकण रेल्वेच्या महिला कर्मचाऱयांना वगळून इतर कर्मचाऱयांना डुटी देण्यात आली होती. मात्र, याच दुसऱया बाजूला कोकण रेल्वेच्या महिला सफाई कर्मचाऱयांनी आपल्या कामात आघाडी घेत, रोज कोकण रेल्वे परिसर साफ ठेवण्यासाठी मेहनत घेत प्रवाशांच्या आरोग्य सेवेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. याबद्दल त्यांचे कोकण रेल्वे कर्मचाऱयांसह प्रवासी वर्गातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.
कोरोना प्रादुर्भावातही मुंबईत लोकल सेवा अत्यावश्यक क्षेत्रातील कर्मचाऱयांना सुरू करण्यात आली. त्यात मध्य, हार्बर मार्गावर लोकल रेल्वे सेवा यशस्वीपणे चालविण्यासाठी महिला कर्मचाऱयांचे योगदान महत्वपूर्ण ठरले होते. यामुळे या कोरोनाच्या कठीण कालखंडातही मुंबई लोकल रेल्वेच्या महिला कर्मचाऱयांनी सुपर वूमन म्हणून छाप पाडली. कोकण रेल्वेच्या सफाई कामगार महिलांनी या कोरोना काळात रेल्वे परिसर स्वच्छ ठेवताना स्वतःची काळजी घेत प्रवाशांचीही काळजी घेण्याचे काम पार पाडले.
कोकण रेल्वेच्या सर्वच महिलांचे उत्कृष्ट काम
कोविड महामारीमध्ये कोकण रेल्वेच्या महिला सफाई कामगारांनीही मोलाची कामगिरी बजावली आहे. कोकण रेल्वे म्हटल्यावर नेहमीचीच गर्दी. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर साफसफाई करण्याची आवश्यकता असते. मात्र, कोरोना काळात अशी गर्दी कमी असली, तरी लांब पल्ल्याच्या गाडय़ा चालू असल्याने या काळातही कोकण रेल्वे स्टेशनवरील आणि रुळावरील सर्व प्रकारची साफसफाई करणे गरजेचे होते. अशावेळी कोकण रेल्वेच्या सगळय़ाच स्टेशनवरील महिला कामगारांनी प्रयत्नपूर्वक साफसफाईची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
कामगार नियमित कामावर
जेव्हा प्रवासी स्टेशनवर येण्याची धास्ती घेत होते. सफाई आणि इतर देखभाल याची चिंता पडली असताना या महिला सफाई कर्मचाऱयांनी अहोरात्र झटून स्टेशन स्वच्छ ठेवण्याची कामगिरी केली. यातील काही महिला कर्मचारी या रोजंदारीवर असून अल्प मोबदल्यातही त्यांनी स्टेशनवरची सफाई काटेकोरपणे केली. या महामारीच्या संकटात प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छतेमुळे कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. हे काम करताना त्यांनी एकही दिवस गैरहजेरी दाखविली नाही. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रेल्वे ट्रक देखभालीतही कामगार गर्क
रेल्वे कर्मचाऱयांसाठी आवश्यक ती नेहमीची सुविधा देणे, इतर नेहमीची कामे व्यवस्थितपणे पार पाडणे, रेल्वे ट्रकची देखभाल, स्टेशनवरील मशिनरीची देखभाल यात या महिला सफाई कामगार गुंतलेल्या पाहायला मिळत होत्या. रेल्वेच्या इतिहासात इतके दिवस रेल्वे बंद असणे पहिल्यांदाच घडत होते. अशावेळी रेल्वे बंद असल्या, तरी देखभाल आणि साफसफाईची कामे करणे खूप महत्वाचे असते. अशावेळी कामगारांची कमतरता भासू नये, यासाठी रेल्वेने चोख बंदोबस्त केला होता. यात या सफाई महिला कामगारांचाही महत्वाचा वाटा आहे.
रेल्वे परिसर स्वच्छता हा महत्वाचा भाग
या महामारीत रेल्वे परिसर रोज स्वच्छ ठेवणे हा महत्वाचा भाग असल्यानेच आम्ही हे काम जबाबदार कर्मचारी म्हणून पार पाडले, असे कोकण रेल्वेच्या महिला सफाई कामगारांनी सांगितले.