प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण रेल्वेचा प्रवास गतिमान व पर्यावरणपुरक करण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून सुरू झालेल्या रोहा ते ठोकूर या 741 कि.मी.च्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यान चार विद्युत उपकेंद्राच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. रत्नागिरीसह ठिकठिकाणी विद्युतीकरणाची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू आहे.
विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपुरक होऊन डिझेल इंजिनावरील इंधन खर्चात वार्षिक सुमारे 100 कोटीची बचत होईल, असे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. नवनवीन सुविधा व अत्याधुनिक यंत्रणेचा आधार घेत या रेल्वेचा प्रवास गतिमान करण्यावर भर दिला जात असतानाच आता विद्युतीकरणाच्या कामानेही गती घेतली होती. या वर्षाअखेरपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रत्नागिरी ते रोहा या मार्गावर विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्याकडे असतानाच 4 विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिवी या ठिकाणी ट्रक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी ही चार उपकेंद्रांचे काम अंतिम टप्प्यात असून वायरिंगचे काम पूर्ण झाले आहे. रोहा ते ठोकूरपर्यंत 741 किलोमीटरच्या संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे.
सध्या डिझेल इंजिनावर 250 ते 300 कोटींचे इंधन खर्च होते. विद्युतीकरणामुळे इलेक्ट्रिक ट्रेनच्या माध्यमातून खर्चात 30 ते 40 टक्के बचत होणार आहे. डिझेल लोकोमोटीव्ह इंजिनला इलेक्ट्रीक लोकोमोटीव्हमध्ये बदलण्यात येणार आहे. या विद्युतीकरणासाठी 1100 कोटी रपये खर्च केला जाणार आहे. रत्नागिरी व कारवार अशा दोन विभागांतर्गंत विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत.
चौकट….
संपूर्ण रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी प्रतीक्षा
कोकण रेल्वेचा सध्याचां प्रवास एकेरी मार्गावरून चालतो. दुपदरीकरणासाठी सुरूवातीच्या टप्प्यात रोहा ते वीर अशा 48 कि.मी.च्या कामाकडे लक्ष वेधण्यात आले. त्यापुढील मार्ग अधिक अवघड, बोगद्यांचा व पुलांचा आहे. या मार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जाते.
चौकट…2
महिनाभरात कधीही चाचणी
रत्नागिरी ते रोहादरम्यान चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरपर्यंत विद्युतीकरणावर रेल्वे चालवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीने महिनाभरात ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम चाचणीनंतरच इलेक्ट्रीक लोकोमोटीव्हचा वापर होणार आहे.