डिझेल खर्च वाढणारचः बिजूरचा अट्टहास कशासाठी?
प्रा. उदय बोडस/ रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण एकूण 5 टप्प्यात होणार असून त्यापैकी रोहा-रत्नागिरी आणि बिजूर-मंगलोर हे 2 टप्पे पूर्ण झाले आहेत. बिजूर-कारवार (उत्तर दिशेने) हा टप्पा कार्यान्वित होण्यास तयार आहे. रत्नागिरी-मडगाव व मडगाव-कारवार हे 2 टप्पे अजून पूर्ण व्हायचे आहेत. दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी रोहा-रत्नागिरी विद्युत इंजिन चाचणी यशस्वी झाली. त्या आधीच मध्य रेल्वेने 19 जानेवारी रोजी प्रसिध्दीपत्रक काढून 10 गाडय़ा रत्नागिरीपर्यंत डाऊन मार्गावर व परतीच्या फेरीत अप मार्गावर विद्युत इंजिनावर धावतील, असे जाहीर केले होते. केवळ डिझेल इंजिनकडून विजेच्या इंजिनवरची वाटचाल पिगबॅक मार्गे होईल असे तज्ञांनी म्हटले आहे.
मध्य रेल्वेने म्हटले होते की, रत्नागिरीत एकूण 20 वेळा विद्युत इंजिन बदलून डिझेल इंजिन लावले किंवा काढले जाणार होते. रत्नागिरीचे महत्व वाढणार होते. परंतु अचानकपणे 4 मार्च रोजी एक वृत्त आले की, विद्युत इंजिन व डिझेल इंजिनाची अदलाबदल करायला 30 मिनिटे इतका वेळ लागू शकतो. म्हणून पिगबॅक पध्दती वापरली जाणार आहे. या पध्दतीत आहे ते विद्युत इंजिन बंद करून (डेड लोको) पुढे डिझेल इंजिन लावणार किंवा आलेल्या अप गाडीचे डिझेल इंजिन काढून विद्युत इंजिन चालू करणार. याला फक्त 10 मिनिटे लागतील म्हणजे रत्नागिरीचा तांत्रिक थांबा 5 ऐवजी आणखी 5 जादा मिनिटे असा 10 मिनिटांचा होईल. 20 मिनिटे वाचतील असे म्हणतात.
ही पिगबॅक पध्दती वापरून गाडी डाऊनमार्गाला कर्नाटकमधील बिजूर स्थानकापर्यंत जाईल, तिथे डिझेल इंजिन काढून पुढे विद्युत इंजिनावर जाईल. अप मार्गावर बिजूर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत इंजिनावर व पुढे विद्युत इंजिन बंद करून डिझेल इंजिनवर रत्नागिरीपर्यंत तर रत्नागिरीत डिझेल इंजिन काढून पुन्हा विद्युत इंजिन कार्यान्वित केले जाईल. या अट्टहासामागे रत्नागिरी डिव्हिजनचे महत्व कमी करून कारवार डिव्हिजनचे महत्व वाढवण्याचे षडयंत्र नाही ना, असा संशय येत आहे. प्रत्यक्षात त्या 10 गाडय़ा पिगबॅक पध्दतीत जाणार किंवा येणार त्यापैकी तुतारी एक्स्प्रेस (सावंतवाडी). मांडवी व कोकणकन्या (मडगाव) या 3 गाडय़ा कारवार डिव्हिजनमध्ये जातच नाहीत. उरलेल्या 7 गाडय़ांपैकी राजधानी एक्सप्रेस, †ित्रवेंद्रम सुपरफास्ट, मंगला एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस व मंगलोर एक्स्प्रेस या 7 ही गाडय़ांना बिजूर येथे नियमित थांबा नाही. मग या गाडय़ा बिजूर येथे परत 10 मिनिटे थांबण्याचा अट्टहास कशासाठी, कोकण रेल्वे मार्गावरील बिजूर हे स्थानक रोह्यापासून 632.3 किमी अंतरावर आहे. रत्नागिरी 204 किमीवर तर कारवार 510 किमीवर आहे. बिजूर या स्थानकात 2 प्लॅटफॉर्म असून तेथे 3 लाईन्स आहेत. स्टेशनवर नियमितपणे फक्त 6 गाडय़ा थांबतात. त्यात मडगाव-मंगलोर डेमू, इंटरसिटी आणि मंगलोर मडगाव शटल पॅसेंजर यांचा समावेश आहे. उत्तरेकडील मुकांनिका रोड बैंदूर या स्थानकावर नेत्रावती, गरीबरथ आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस थांबतात. दक्षिणेकडे सेनापुरा आणि कुंदापुरा ही मोठी स्थानके आहेत. मग ज्या स्थानकावर विशेष सुविधा नाहीत, तिथे 10 मिनिटे गाडी थांबली तर प्रवाशांना खायला-प्यायला मिळणार नाही तसेच सुधारित स्पेशल वेळापत्रकात क्रॉसिंगचा प्रश्न निर्माण होऊ शकेल अशा बिजूरपर्यंत पिगबॅकचा आग्रह का?
आपल्या ‘ऑपरेशनल इफिशिएन्सी’चा अभिमानाने उल्लेख करणाऱया कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी सुरु झाल्यापासून दररोज सर्वच गाडय़ा 10 ते 54 मिनिटे विलंबाने धावत आहेत. कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर करंट डेन पोझीशनवर करंट स्टेटस पाहिल्यास लक्षात येईल की, ज्या 10 गाडय़ा पिगबॅक पध्दतीने चालवायच्या विचार आहे, त्याच विलंबाने धावत आहेत. अगदी राजधानीही आठवडय़ातून 1 दिवस तरी उशिराने धावते. मग बिजूरचा काय फायदा होणार आहे. बिजूर येथे तेवढा कर्मचारी वर्ग आहे का, तसेच डिझेल-इलेक्ट्रीक लोको पायलट लॉबीला सुविधा आहेत का? असा प्रश्न आहे.
रत्नागिरीपासून पुढे किंवा येताना रत्नागिरीपर्यंत डेडलेको पळवत न्यायचे आहे. 204.3 ते 632.3 या 428 किमी अंतरावर एक जादा लोड नेण्यासाठी डिझेलचा जादा खर्च किती होईल, याची माहिती उघड केली जाणार आहे का? तसेच या डिझेल इंजिनांमध्ये डिझेल हे कारवार/मडगाव येथे भरणार की पुन्हा बिजूर-उडुपी असा वाढीव प्रवास करून डिझेलचा खर्च वाढवणार, याची काहीच माहिती सध्या मिळत नाही. धावत्या गाडीला 1 ऐवजी 2 इंजिने असतात तेव्हा इंजिन स्टॉप फलकापासून पाठीमागे येणाऱया सर्वच डब्यांच्या जागा एकाने चुकतात. त्यामुळे एसी डब्यांची जागा पुढे-मागे होऊ शकते. ए-1 आणि एचए-1 मधील प्रवासी व्हीआयपी मानले जातात. त्यांना एक डबा पुढे-मागे झाला तर ते आवाज उठवणारच ना? त्यात राजधानी सुध्दा आहे. 23 डब्यांच्या गाडीचा शेवटचा डबा प्लॅटफॉर्मच्या टोकाला गेला तर गार्डला सुध्दा अडचण होऊ शकते.
कोकण रेल्वेचा इतिहास बारकाईने तपासला तर पहिल्यापासून रत्नागिरीला दुय्यम वागणूक मिळत आली आहे. पाणी-डिझेल भरण्याची सोय रत्नागिरीत नाही. दादर पॅसेंजर सुध्दा मडगावपर्यंत गेली. स्वतः सुरेश प्रभू यांचे संपर्क कार्यालय असूनसुध्दा रत्नागिरीत काही विशेष प्रवासी सुविधा नाहीत. विद्युतीकरणानंतर किमान काही महिने रत्नागिरीचे महत्त्व वाढेल असे वाटत असताना पिगबॅक पध्दतीने गाडय़ा पळवून रत्नागिरीचा ताण कमी होणार नाही. पण महत्त्व नक्की कमी होईल, असे वाटते!
बिजूर की कारवार?
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचा पहिला टप्पा रोहा-रत्नागिरी यशस्वी झाल्यावर ‘रत्नागिरी येथे लोकोशेड व डिझेल टँक हवी’ असे वृत्त ‘तरुण भारत’ने 7 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द केले होते. त्यानंतर 7 मार्च रोजी मंगलोर-कारवारपर्यंत विद्युतीकरण चाचणी यशस्वी झाली. तत्पूर्वी 4 मार्च रोजी पिगबॅक पध्दतीने बिजूरपर्यंत प्रवास होणार, असे वृत्त आले होते. आता 7 मार्च रोजी कारवारपर्यंत चाचणी यशस्वी झाल्याने पिगबॅक पध्दत कारवारपर्यंतच नेऊन पुढील 122 किमी अंतराचे डिझेल वाचवणार का, असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.