‘सिंधुदुर्ग विमानतळ’ सुरू झाल्यामुळे कोकण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. परदेशी पर्यटक येण्याचा मार्गही मोकळा झालेला आहे. मात्र विमानतळाचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा कोकण विकासाची नांदी ठरण्याऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी जुगलबंदी रंगली.
रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने रोजगारासाठी कोकणी माणसं मुंबईत नोकरी-चाकरी करू लागले. कोकणात दळणवळणाच्या सुविधाही नव्हत्या. त्यामुळे कोकणात रेल्वे यावी, अशी मागणी सुरू झाली. ही मागणी पूर्ण होण्यास स्वातंत्र्यानंतर पाच दशके वाट पाहावी लागली. 26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वे सुरू झाली. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची मागणी पुढे आली. त्यालाही दोन दशके लागली आणि अजूनही महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. मात्र लवकरच ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
कोकण रेल्वे आणि महामार्ग चौपदरीकरणाचे विकास प्रकल्प झाल्यामुळे कोकण विकासाला चालना मिळायला सुरुवात झाली. परंतु, पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हय़ात पर्यटन विकासाला चालना मिळायला हवी असेल, तर कोकणात देशी-विदेशी पर्यटक आले पाहिजेत आणि त्यासाठी हवाई मार्ग पर्यटकांना अत्यंत सोयीचा ठरू शकतो. त्यामुळे विमानतळाची मागणी पुढे आली. परंतु, हे विमानतळही पूर्ण होण्यास दोन दशकाहून अधिक काळ लागला.
विकासाच्या दृष्टीने मागे राहिलेल्या कोकणात कोकण रेल्वे आणि महामार्ग चौपदरीकरणामुळे दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर विमानतळाचा प्रकल्प साकारला गेला आणि अखेर एकदाचे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी विमानतळावर 9 ऑक्टोबरला विमान उतरले. त्यानिमित्ताने एक जंगी उद्घाटन सोहळा पार पडला. परंतु, या सोहळय़ात कोकणात रंगणाऱया डबलबारी भजनाप्रमाणे राजकीय डबलबारीचा सामना रंगला.
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे हे आजी-माजी मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर राजकीय टीका-टिप्पणी होईल, हे अपेक्षितच होते. परंतु, त्याहीपेक्षा या उद्घाटन सोहळय़ाच्या निमित्ताने कोकण विकासाची नांदी ठरेल, कोकण विकासासाठी नव्या घोषणा होतील, विमानतळ विकासाच्या पूरक अशा सोयी सुविधांबाबत बोलले जाईल, अशा मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र या दोन्ही आजी, माजी मुख्यमंत्र्यांमध्ये टोकाचे राजकीय वैमनस्य असल्याने एका चांगल्या प्रशासकीय सोहळय़ातही दोन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. त्यामुळे उद्घाटन सोहळय़ानंतर कोकण विकासाची चर्चा रंगण्याऐवजी राजकीय जुगलबंदीचीच चर्चा रंगली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ासह कोकणी जनतेसाठी कोकणच्या इतिहासातील 9 ऑक्टोबर हा दिवस सुवर्णक्षण होता. त्यामुळे विमानतळ उद्घाटन सोहळय़ाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या उद्घाटन सोहळय़ाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, तर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
आजी-माजी मुख्यमंत्री व इतर मंत्री विमानतळ उद्घाटनाला उपस्थित असल्यावर कोकणच्या विकासासाठी निश्चितच नव्याने काहीतरी पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. कुठल्याही जिल्हय़ात असा मोठा सोहळा ज्यावेळी होतो आणि मंत्रिमहोदय येतात, त्यावेळी नक्कीच त्या जिल्हय़ासाठी विकासाच्या नव्या संकल्पना मांडल्या जातात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याविषयी बोलले, परंतु ते होण्याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांकडेच बोट दाखवले. भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायचे असेल, तर यापुढे तरी राजकारण बाजूला ठेवून विकासाची जुगलबंदी रंगली तर कोकणी जनतेसाठी ते बरेच हिताचे ठरू शकेल.
सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन सोहळय़ाचे सूत्रसंचालन खासदार विनायक राऊत यांनी करताना विमानतळाचे मालक उद्योगमंत्री सुभाष देसाई असल्याचा उल्लेख केला. त्याचवेळी 1992 मध्ये त्या वेळचे खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी या विमानतळाची जागा निश्चित केल्याचा उल्लेख केला. तर सुभाष देसाई यांनी बोलताना विमानतळ कामाचे श्रेय खासदार विनायक राऊत यांना दिले. त्यावर राणे यांनी आपल्या भाषणात खासदार राऊत यांच्या सूत्रसंचालनावरच आक्षेप नोंदवला. त्याशिवाय विमानतळाचे मालक म्हणजेच आयआरबीचे अध्यक्ष वीरेंद्र म्हैसकर हे बदलले काय? असा खोचक सवाल केला. एवढेच नव्हे, तर 2009 साली आपण जेव्हा विमानतळाचे भूमिपूजन केले, तेव्हा शिवसेनेच्या ज्या नेत्यांनी विमानतळाला विरोध केला होता, तेच आता व्यासपीठावर आहेत, असे खासदार राऊत यांचे नाव न घेता सांगितले.
राणेंनी टीका करण्याची संधी सोडली नाही म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विकासाच्या मुद्यावर जास्त बोलण्याऐवजी राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. विमानतळ उद्घाटनाचा कार्यक्रम हा आनंदाचा आहे, आदळआपट करण्याचा नाही. चांगल्या कार्यक्रमात काळा टीका लावणारा कोणीतरी असावा लागतो, तोही व्यासपीठावर आहे. कोकणच्या लाल मातीत बाभळीचीही झाडे उगवतात, त्याला माती काय करणार? सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, पण कुणीतरी म्हणेल मी बांधला. काहीजण इथे मळमळ व्यक्त करण्यासाठी आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंना टोमणे लगावले. राजकारणात कोणी कुणाचा दुश्मन नसतो किंवा मित्रही नसतो, असे म्हटले जाते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचे वैमनस्य असले, तरी विमानतळ उद्घाटन सोहळ्य़ानिमित्ताने दोघांमधील कटुता कमी करण्याची संधी होती. दोन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप टाळून एक पाऊल पुढे टाकत जसे एकाच व्यासपीठावर आले, तसे विकासासाठी एकत्र आले असते तर कोकणात विकासाच्या नव्या पर्वाची नांदी झाली असती.सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्याने विदेशातील पर्यटकांना येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र येणाऱया सर्व पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवा.
संदीप गावडे