उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ग्वाही
प्रतिनिधी/ चिपळूण
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भुमिका घेतली आहे. याबाबतची प्रक्रिया जाणून घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कोकण विद्यापीठाबाबत चर्चा करण्याची ग्वाही सामंत यांनी दिली आहे. सामंत यांच्या या भुमिकेचे ऍड विलास पाटणे यांनी स्वागत करताना कोकण विद्यापीठाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय पाठपुराव्याची गरज व्यक्त केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ना. उदय सामंत यांनी सोमवारी रत्नागिरी जिल्हा दौऱयाला चिपळूण येथून प्रारंभ केला. यावेळी बोलताना सामंत यांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
रत्नागिरीतील 45 व सिंधुदुर्गमधील 38 अशा 83 महाविद्यालयांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे. कोकणविषय प्रश्नांचे अभ्यासक असलेल्या व शैक्षणिक क्षेत्रातही सक्रीय असलेल्या ऍड. विलास पाटणे यांनी कोकणच्या शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सामंत यांच्या ग्वाहीनंतर पाटणे यांनी या भुमिकेचे स्वागत केले आहे. या विद्यापीठामुळे कोकणी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. स्थानिक गरजेनुसार सुसंगत रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करता येतील असा विश्वास पाटणे यांनी व्यक्त केला आहे.
उदय सामंत यांनी आमदार असताना कोकण विद्यापीठासाठीच्या चळवळीत सहभाग घेतला आहे. आता चळवळीतील कार्यकर्ताच या खात्याचे मंत्री झाल्याने कोकण विद्यापीठाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आहे. कै. पी. के. सावंत यांनी दापोलीत कृषी विद्यापीठ आणले, त्याप्रमाणे उदय सामंत यांनी कोकण विद्यापीठ आणावे अशी अपेक्षाही पाटणे यांनी व्यक्त केली.