प्रमोद जठार यांची माहिती : शासनाकडून भूसंपादनाच्या कामाला सुरूवात!
वार्ताहर / वैभववाडी:
कोकण रेल्वे मार्गावरील प्रलंबित असलेले कोकिसरे रेल्वे फाटक येथील भुयारी (आरयुबी) मार्गासाठी केंद्र सरकारकडून 64 कोटी निधी मंजूर झाला आहे. भुयारी मार्ग होण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन कामाला संबंधित विभागाकडून सुरुवात झाली असून सदर कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या भुयारी मार्गासाठी केंद्रीयमंत्री नितिन गडकर, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून 64 कोटी इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच रेल्वे फाटकाचा बारा तासापेक्षा बंद होत असल्याने होणारा अडथळा कायमचा मिटणार आहे, असे जठार यांनी सांगितले.
यासंदर्भात शुक्रवारी वैभववाडी तहसील कार्यालयात माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी श्रीमती बारटक्के संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक पार पडली. दरम्यान, अधिकारी व पदाधिकारी यांनी रेल्वे फाटकनजीक जाऊन भुयारी मार्गासाठी संपादित करण्यात येणाऱया जमिनीची पाहणी केली. यावेळी पं. स. सभापती अक्षता डाफळे, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, जि.प. सदस्य सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, संतोष कानडे, नायब तहसीलदार नाईक, बाबा कोकाटे व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भूसंपादन करण्यासाठी प्रशासनाकडून एजन्सी नेमण्यात आले असून संबंधित एजन्सी प्रशासनाच्या सहकार्याने भूसंपादनाचे काम करणार आहे. संबंधित जमीन मालकांशी बैठक घेण्यात येणार आहे. भूसंपादित झाल्यानंतर तात्काळ या कामाचे टेंडर काढण्यात येईल व कामाला सुरुवात होईल, असे जठार यांनी बैठकीत सांगितले. भुयारी मार्गासाठी लागणारी जवळपास पावणे तीन हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱयांनी सांगितले.
कोकण रेल्वे मार्गावरून 24 तासात जवळपास 60 ते 70 ट्रेन ये-जा करतात. प्रत्येक ट्रेनवेळी 15 मिनिटे फाटक बंद करावे लागते. म्हणजेच 24 तासापैकी जवळपास 11 तास फाटक बंद असते. या रेल्वे फाटक ठिकाणी सुरुवातीला उडाण पूल व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु फाटकाच्या दोन्ही बाजूने चढ उतार व यु आकाराची वळणे असल्याने उडाणपूलाचा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर याच फाटकानजीक भुयारी मार्ग (आरयुबी)चा सर्व्हे करण्यात आला. या कामाचा पाठपुरावा प्रमोद जठार गेली सात वर्षे करीत आहेत. या कामाला निधीप्राप्त झाल्याने लवकरच रेल्वे फाटकाचा अडसर दूर होणार आहे.