कसबा बीड /प्रतिनिधी
बहिरेश्वर तालुका करवीर येथील कोगे -बहिरेश्वर दरम्यान असणाऱ्या धरणाची उंची वाढवणे गरजेचे आहे, अशी मागणी बहिरेश्वर सरपंच साऊताई बचाटे व कोगेचे उपसरपंच विश्वास पाटील यांनी सांगितले. यावर्षी मान्सून वेळेत आल्याने जोरदार स्वरूपात पाऊस पडला. त्यामुळे बहिरेश्वर बंधारा पाण्याखाली गेला होता. पाणी कमी झाल्याने या धरणांमध्ये पुरातून वाहून आलेले झाडाचे ओंडके व पाला-पाचोळा यामुळे धरणास धोका निर्माण झाला आहे.
या धरणास कोगे खडक धरण असे नाव आहे. उंचीने लहान असलेले धरण 1956 मध्ये पाणी अडवण्याच्या हेतूने या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. 1976 ला वाहतुकीसाठी व पाणी अडवण्यासाठी या दोन हेतूने या धरणाची उंची वाढवण्यात आली होती. त्या त्यानंतर आज अखेर या धरणाचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.
गेली कित्येक वर्षे अनेक उन्हाळा -पावसाळा पाहिलेले हे धरण आता अंतिम घटका मोजत आहे. पाया पासूनच दगडी बांधकाम निघू लागलेले आहे . आज आखेर या धरणाचा फक्त किरकोळ स्वरूपात मेन्टेनन्स करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला म्हणजे जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस हे धरण प्रवासासाठी खुले असते ,नाहीतर दोन ते अडीच महिने पाण्याखालीच राहते. त्यामुळे कोगे, बहिरेश्वर, म्हारुळ, आमशी आधी गावातील नागरिकांची गैरसोय होते.
सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा या धरणावरून पाणी कमी होते, तेव्हा या धरणांमध्ये मोठे झाडाचे ओंडके, पालापाचोळा असा असंख्य कचरा अडकून रहातो. तसेच धरणाच्या दोन्ही बाजूस गाळ साचून त्यामधून प्रवास करणे धोक्याचे होते. साचून राहिलेल्या कचऱ्यामुळे धरणास धोका निर्माण झाला आहे. त्यावेळेस कचरा काढणे व गाळ पाण्याने धुणे ही सर्व कामे ग्रामपंचायत बहिरेश्वर व तरुण वर्गाकडून केले जाते.
वास्तविक पाहता हे धरण पाटबंधारे भागाकडून बांधण्यात आलेले आहे. या धरणाची डागडुजी व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याचे काम पाटबंधारे विभागाचे आहे. पण पावसाळा सुरू झाला की या धरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते अशी भागातील नागरिकांमध्ये कुजबुज चालू आहे.