वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोचीचा मुख्य भूभाग आणि लक्षद्वीप बेटसमुहादरम्यान पाण्यातून ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिविटी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलद्वारे (ओएफसी) कोची आणि लक्षद्वीपच्या 11 बेटांदरम्यान एक थेट दूरसंचार लिंक उपलब्ध करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाकरता 1072 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाकरता एका संस्थेकडून वित्तसहाय्य प्राप्त होणार आहे. या संपर्क योजनेमुळे लक्षद्वीपच्या बेटांवर दूरसंचार सुविधांमध्ये मोठय़ा बँडविड्थच्या उपलब्धतेने मोठी सुधारणा होणार आहे. सबमरीन कनेक्टिव्हिटी प्रकल्प नागरिकांना त्यांच्या घरीच ई-सुशासन सेवा प्रदान करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उद्योग तसेच सेवा क्षेत्राला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.
लक्षद्वीपच्या बेटांमध्ये वाहतूक सेवांचे विशाल केंद्र होण्याची क्षमता आहे. बीएसएनएलला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. अरबी समुद्रात असलेल्या या केंद्रशासित प्रदेशात असणारी अनेक बेटे भारताकरिता सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या बेटांवर राहणाऱया लोकांना सुरक्षित, मजबूत आणि विश्वासार्ह तसेच उत्तम दूरसंचार सेवांची उपलब्धतापूर्ण देशासाठी सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लक्षद्वीपमध्ये सद्यकाळात दूरसंचार संपर्क व्यवस्था उपग्रहांद्वारे प्रदान केली जात आहे.