पृथ्वीवर पाणी कोठून व कसे आले? हा संशोधकांच्यासमोरचा गेल्या दोनशे वर्षातील सर्वात गहन प्रश्न आहे. पाण्याची निर्मिती पृथ्वीवरच झाली की ते बाहेरून पृथ्वीवर आले, यावर शास्त्रज्ञांमध्ये दोन तट पडले आहेत. पृथ्वीवर पाणी बाहेरून आले ही बाजू भक्कम करणारा नवा पुरावा एका उल्केच्या स्वरुपात समोर आला आहे. या उल्काखंडाचे वय 460 कोटी वर्षे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या उल्काखंडात पाण्याचे अंश दिसून आले आहेत. ज्यावेळी पृथ्वीवर पाण्याची निर्मिती झाली नव्हती, त्या काळातील ही उल्का असल्याने तिच्यात सापडलेले पाण्याचे अंश पृथ्वीवर पाणी बाहेरून आल्याचे दर्शवितात, असे काही संशोधकांचे मत आहे. या उल्काखंडात पाण्याबरोबरच मीठ व इतर क्षारांचे अंशही आढळून आले आहेत. रित्सुमिकान विद्यापीठाच्या संशोधकांनी यावर अधिक अभ्यास चालविला आहे. या उल्केची निर्मिती जेव्हा झाली तेव्हाच तिच्यात पाणी, मीठ आणि कार्बन डायऑक्साईड यांचे अंश होते. याचाच अर्थ असा की विश्वात ज्या ठिकाणी हे तिन्ही पदार्थ सापडतात, तेथे या उल्केची निर्मिती झाली असावी. ही उल्का पृथ्वीच्या जडणघडणीच्या अभ्यासात मोलाची भूमिका बजावेल, असे गृहित धरण्यात आले आहे.