प्रतिनिधी / वारणानगर
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रात सुमारे साठ हजार एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील ग्रामपंचायतीने तीन विभाग पाडून कोडोलीच्या सीमा बंद करीत बाहेर गांवच्या व्यक्तीना प्रवेश देखील बंद केला आहे. कोडोली येथे ऐका पेक्षा जास्त प्रभाग करून प्रभागाच्या सीमा सील करण्याचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी दिले होते. त्या आदेशानुसार कोडोलीचे तीन प्रभागात विभाजन करून सीमा सील करण्यात आल्या असून ही सीमा बंदी तीन मे पर्यंत लागू असणार आहे.
कोडोली हे मोठ्या लोकवस्तीचे गांव असलेने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व खबरदारीचा उपाय योजना म्हणून पूर्ण गाव बंदी करत असताना जमाव बंदी करताना प्रशासनाला मोठी अडचण निर्माण होत आहे. या करिता कोडोलीचे कोडोली पूर्व, कोडोली पश्चिम व निवृत्ती कॉलोनी ते वारणानगर अशा तीन प्रभागात विभागणी करून त्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी,अत्यावश्यक बाबी ह्या प्रभागा पुरत्याच मर्यादित राहतील. बाहेरील गावातील व्यक्तींना गावात प्रवेश नाकारला जाणार असल्याचे यावेळी सरपंच शंकर पाटील व ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम यांनी सांगितले आहे.