वारणानगर / प्रतिनिधी
येथील कोडोली-सैदापूर या प्रमुख जिल्हा मार्गावरील कोडोली, ता.पन्हाळा येथील अंबाबाई मंदीर ते कोळ्याची चिंच (स्वामी मठ) पर्यन्तच्या गटारांचे काम वाहत्या पाण्यातच होत असल्याने तसेच त्यात निकृष्ठपणा असल्याने या कामाचा निधी वाया जाणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू त्यामुळे असंतोष पसरला आहे. अंबाबाई मंदीर ते स्वामी मठा पर्यन्त दोन्ही बाजूचे गटर व रस्ता करण्यासाठी कमी अतंर असूनही सार्व. बांधकाम विभागाने सुमारे ८५ लाख रू.चा निधी मंजूर केला आहे.
गेली दोन दिवस वाहत्या पाण्यातच गटाराचे काम सुरू होते त्यामुळे सिमेंट, वाळू पाण्यातच वाहून जात असल्याचे तसेच निकृष्ठ दर्जाचे सुरू असलेले काम शनिवार दि. १ रोजी ग्रामस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोळी यांच्या निदर्शनास आणून बंद ठेवण्यास भाग पाडले होते. आज रविवार दि. २ रोजी सुट्टी पाहून पाणी कमी प्रमाणात वाहत असतानाच गटराचे काम सुरू ठेवल्याने नागरिकांनी निषेध नोंदवला. बांधकाम विभागाचा काम बंदचा आदेश ठेकेदाराने धाब्यावर बसवून आज सुट्टी दिवशी काम सुरू ठेवल्याने या गटरांच्या कामाचा निधी पाण्यातच घालवणार व पुन्हा हेच पाणी रस्त्यावरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने काम कोणत्या योजनेतून आहे, कोणत्या निकषाने पूर्ण करावयाचे आहे याचे अंदाजपत्रक किती आहे काम पूर्ण करण्याचा व कामानतंर वर्ष देखभाल रहाणार याचा फलक लावलेला नाही याबाबत तसेच रस्त्याची एकूण रूंदी, त्या बाजूने असणारे अतिक्रमण काढण्यासाठी तसेच रस्ता चांगला होण्यासाठी तसेच ठेकेदारावर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह पाटील, विलास पाटील, भाऊ दरबारे, पोपट पाटील श्री. रोकडे या सह अन्य ग्रामस्थानी सद्या सुरू असलेल्या निकृष्ठ कामाबाबत हरकत घेतली असून काम सुरू असलेल्या ठिकाणी पत्रकारांना बोलावून या कामाची माहिती दिली.