प्रतिनिधी / वारणानगर
पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक पन्नास हजारांवर लोकसंख्या असलेल्या कोडोली ग्रामपंचायतीच्या नवीन निर्माण झालेल्या २४x७ नळ पाणी पुरवठा योजनेतील कामे अर्धवट ठेवून सदर योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करीत सदरची योजना एकतर्फीच हस्तातंरण केल्याचे पत्र उपअभियंता जे. डी. काटकर यांनी ग्रामपंचायतीला दिल्याने गावांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
कोडोलीसाठी सातही दिवस चोवीस तास पाणी अशा केंद्र व राज्य शासनाच्या पेयजेल योजनेतून सुमारे अतंर्गत ४४ कि.मी. लांबीच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे १४ कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी मंजूर होता. या योजनेची कामाची दिलेली मुदत तसेच वेळोवेळी वाढीव मुदत देवूनही काम वेळेत पूर्ण झालेले नाही. अद्याप या कामातील त्रुटी शिल्लक असताना ऑगष्ट २०१९ पासून हि योजना हस्तांतरण करून व्यावी. यासाठी जीवन प्राधीकरणने तगादा लावला होता. अपूर्ण कामामुळे आजही ग्रामपंचायतीने ही योजना हस्तांतरण करून घेतलेली नाही. अखेर प्राधिकरणचे उपअभियंता जे. डी. काटकर यानी ३ जानेवारीच्या लेखी पत्राने एकतर्फी हस्तातंरण केल्याचे पत्र दिल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
जीवन प्राधिकरणाने कोडोली योजनेचे काम पूर्ण झाले आहे. चाचणी स्वरुपात ३ महिने चालवुन गावात नियमित पाणी पुरवठा करणेत आलेला आहे. तसेच दि. १ ऑक्टोबर २०१९ पासून सदर योजना आपल्या ग्रामपंचायतीमार्फत चालविण्यात येत आहे. योजना हस्तांतर करुन घेणेस लेखी कळवूनही अद्याप आपण योजना ताब्यात घेऊन हस्तांतर केलेबाबत पत्र सादर केलेले नाही. आज तागायत योजनेतून गांवास सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे. योजना २४x७ असल्याने सर्व नळ जोडणीस जलमापक बसविणे आवश्यक आहे. याबाबत आपणांस वारंवार सूचित करण्यात आले आहे. तसेच सद्यस्थितील गावांतील नळ जोडणीस सध्या तोटयाही बसविलेल्या नाहीत. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. तरी सर्व नळ जोडणीस तोटया बसविणे व जलमापक बसविणेची कार्यवाही आपले स्तरावरुन करण्यात यावी. सध्या गावांत दररोज ६० ते ६५ लक्ष लिटर्स पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पर्यायाने विजदेयकही जास्तीचे येणार आहेत. तरी सवलतीच्या दरातील (रात्रीच्या वेळी) पंपीग करणे आवश्यक आहे. याबाबतही दक्षता घेण्यात यावी. दि. १ ऑक्टो. २०१९ पासून गावास ग्रामपंचायती मार्फत सुरळीत पाणी पुरवठा चालू असून सदरची योजना ही एकतर्फी हस्तांतरीत करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी. यापुढे योजना देखभाल दुरुस्ती करणेची सर्वस्वी जबाबदारी स्वायत्य संस्था या नात्याने ग्रामपंचायतीची राहील याचीही नोंद घ्यावी असे पत्र उपअभियंता जे. डी. काटकर यांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी कोडोली, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, कोल्हापूर यांसह संबधिताना कळवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नळपाणी योजनेचे वास्तव
२४x ७ नळपाणी पुरवठा योजना १४ कोटी रूपयांवर मंजूरी असून योजनेतील पाईप लाईनचे अतंर्गत अतंर ४४ कि. मी. आहे. नळ पाणी जोडणी धारक संख्या ३७००च्या वर आहे. ग्राहकांच्या घराजवळील गटारा पर्यंतच जोडणी दिली आहे. सर्वत्र समान दाबाने पाणी पुरवठा होणारी योजना तथापी कमी अधिक दाबाने पाणी पुरवठा काही ठिकाणी पाणी जात नसल्याने जुन्याच योजनेतून पाणी पुरवठा आजही केला जात आहे.
ग्राहकांना एमडीपी पाईपची जोडणी करण्यास त्यासाठी लागणारे साहित्य कोडोलीत मिळत नसल्याने ग्राहकानी रिकामेच पाईपने पाणी खुल्या जागेत सोडल्याने पाण्याचा अपव्यय होत असून याला जबाबदार ठेकेदार व जीवन प्राधिकरणालाच धरले पाहीजे. नळ पाणी कनेक्शन जोडणीस लागणारे साहित्य कोडोलीत उपलब्ध होण्याची मागणीही ग्राहकांतून होत आहे. आवश्यकतेपेक्षा जादा पाणी पुरवठा होऊनही ग्रामस्थांना काही भागात पाणी मिळत नाही, वीजबिलात मात्र लाखो रुपयांची वाढ मात्र झाली आहे.