ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये 20 जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले आहे. अर्टी-शर्थीविना भेटण्याच्या परवानगीशिवाय पाकिस्तानने चर्चेसाठी इंग्रजी भाषेची सक्ती करु नये, अशी मागणी सुद्धा भारताने केली आहे.
कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात असून हेरगिरीच्या खोटया आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली आहे. भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानने दावा केला होता की, गेेल्या आठवडयात कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला होता. भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना परत भारतात आणण्यासाठी भारत सर्व परीने प्रयत्न करेल, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.