भूसेना प्रमुख मुकुंद नरवणे यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजारी देशांकडून धोका संभवत आहे. हे दोन्ही देश एकत्रितरित्या भारतासमोर संकट निर्माण करू शकतात. मात्र भारतीय सेना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे, असा आत्मविश्वास भूसेनाप्रमुख मुकुंद नरवणे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला.
भारत-चीन यांच्या लडाख सीमेवर जो तणाव आहे, तो चर्चेद्वारे सोडविला जाईल अशी भारताची आशा आहे. त्या दिशेने बोलणीही सुरू आहेत. मात्र, चर्चेद्वारे तोडगा न निघाल्यास सैन्य देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास सदैव सज्ज आहे. चीनशी संघर्षाच्या काळात उत्तर सीमेवर अधिक सैन्य नियुक्त करून सर्व असमतोल दूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन त्यानी केले.
दहशतवादावर नियंत्रण
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद अद्याप सुरूच असला तरी गेल्या काही दिवसांमध्ये त्यावर नियंत्रण आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. काश्मीरच्या आंतभार्गात परिस्थिती नियंत्रणात असली तरी आम्ही सीमेवरील सैन्य कमी करण्याच्या स्थितीत अद्याप नाही आहोत. पाक व चीन अशा दोन्ही सीमांवर आमची सज्जता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अत्याधुनिक सामग्रीचा पुरवठा
भारतीय सैन्याचे अत्याधुनिकीकरण करण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. आधुनिक शस्त्रसामग्रीची खरेदी आणि देशात उत्पादन यासाठी योजना सज्ज आहेत. भविष्यकाळातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आतापासून नियोजनपूर्वक पावले टाकली जात आहेत, अशी महत्वाची माहिती नरवणे यांनी दिली.