गेल्या आठवडय़ात नरसिंह चतुर्दशी होती त्या निमित्ताने. भक्त प्रल्हाद यांचे रक्षण करण्यासाठी भगवंत कसे एका खांबातून प्रकट होतात हे वर्णन वाचताना त्याचे पिता हिरण्यकश्यपू यांनी ब्रह्मदेवाना फसवून अनेक वर प्राप्त केले पण अंतिमतः त्याला भगवंतांनी त्या सर्व वरांचा मान ठेवून कसे ठार मारले हे आपण ऐकले किंवा वाचले असेलच. यावरून लक्षात येते की कोणीही भगवंताला फसवू शकत नाही. प्रल्हादाकडून भगवंताची भक्ती कशी करावी आणि अशा भक्ताचे रक्षण भगवंत कसे करतात हे आपण ऐकलेले आहे. पण हिरण्यकश्यपूकडूनही काहीतरी शिकण्यासारखे आहे ते आपण विसरून जातो. हिरण्यकश्यपू हा भगवान विष्णूंना आपला शत्रू मानायचा. एवढेच नव्हे तर त्यांना ठार करण्यासाठी आपण अमर झाले पाहिजे यासाठी त्याने हजारो वर्षे कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवांनी त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. हिरण्यकश्यपूने अमर होण्याचा वर मागितला.
ब्रह्मदेवांनी सांगितले माझे आयुष्य जरी सर्वात जास्त असले तरी मलाही मृत्यूला शरण जावे लागते. त्यामुळे मी असा वर देण्यास असमर्थ आहे. यावर हिरण्यकश्यपूने तपस्येच्या बळावर प्राप्त झालेली बुद्धी वापरून ब्रह्मदेवाकडे अप्रत्यक्षपणे अमर होण्यासाठी अनेक वर मागितले. हिरण्यकश्यपू म्हणाला, ‘मला दिवसा आणि रात्री पण मृत्यू येणार नाही, घरात किंवा घराबाहेरही मृत्यू येणार नाही, शस्त्राने किंवा अस्त्राने मृत्यू येणार नाही, मनुष्य व पशूकडून मृत्यू येणार नाही, जमिनीवर आणि आकाशातही नाही’ असे अनेक बुचकळय़ात टाकणारे वर मागितले. ब्रह्मदेवांनीही ‘तथास्तु’ म्हणून त्याला हे वर दिले. कोणालाही वाटेल की एवढे वर मिळाल्यावर मी अमर झालो आणि मी कसे भगवंताला फसविले. थोडीशी ताकत, बुद्धी, ऐश्वर्य, सत्ता प्राप्त झाली की आपल्यालाही वाटते की मी या सर्वाचा उपयोग मृत्यूपासून स्वतःला वाचवण्यासाठी करेन. या अहंकाराने व्यक्ती भगवंताच्या अस्तित्वालाही आव्हान देते. भगवंताच्या सृष्टीचा स्वतःच्या उपभोगासाठी उपयोग करून, त्यांनी दिलेल्या गीता भागवतमधील आदेशांचे उल्लंघन करून भगवंताचे अस्तित्व नाकारणे ही हिरण्यकश्यपूची वृत्ती आहे. आज रिमोट कंट्रोलनी सर्व काही नियंत्रित करता येत असलेल्या जगात भगवंत या सृष्टीचे नियंत्रण करीत आहेत हेच आपण विसरत चाललो आहोत. काही प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होते तेव्हा मी काहीही करू शकतो ही भावना आपल्या मनात जागृत होते. त्याचबरोबर मी धर्माचे पालन करीत नाही, मला कोणी काहीही करण्यापासून अडवू शकत नाही, माझ्यावर कोणाचे नियंत्रण नाही याउलट सर्वानी माझे ऐकले पाहिजे, सर्व काही माझ्या मनाप्रमाणेच झाले पाहिजे, माझेच नियंत्रण सर्वावर पाहिजे ही हिरण्यकश्यपूची वृत्ती निर्माण होते. अशा वृत्तीतून मग अमर्याद भोग करण्यासाठी लागणारी संपत्ती, सत्ता भ्रष्टाचारी मार्गाने अर्थात भगवंताला फसवून प्राप्त करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होत जाते. मग आपण विसरून जातो की भगवंतांना फसविण्याचा नादात आपणच फसत चाललो आहोत.
भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हिरण्यकश्यपूसारख्या असुरी वृत्तीच्या व्यक्तीचे वर्णन करताना 16 व्या अध्यायात सांगतात ‘असुरी मनुष्य असा विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही असेच मारले जातील. मीच सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढय़ मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी
यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन. अशाप्रकारे असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.’ अशा असुरी व्यक्तींचा स्वतःवर अतिविश्वास असतो आणि कोणतेही भ्रष्ट कृत्य करायला ते मागेपुढे पहात नाहीत. मी काय करतो याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे मला कोणतीही शिक्षा होणार नाही या समजुतीमुळे ते अनेक पाप कृत्ये करीत राहतात. मी केलेल्या पाप कृत्याला कोणी साक्षी नाही अशी त्यांची कल्पना असते. अशा लोकांना आपण पाप करतो आहे हेच मान्य नसते कारण ते स्वतःला धर्मशील आणि पुण्यवान समजतात. हिरण्यकश्यपूसुद्धा धार्मिक होता पण त्याला मिळालेल्या वरामुळे त्याची गैरसमजूत झाली की तो आता कसाही वागला तरी चालेल, भगवान विष्णूही त्याचे काही वाकडे करू शकणार नाही याबद्दल हिरण्यकश्यपूची खात्री होती.
जेव्हा आपण अशा दांभिक भावनेने ग्रस्त होतो तेव्हा आपल्याला वास्तवाची जाणीव राहत नाही. भगवंत सृष्टीच्या कणाकणांमध्ये आहे व सृष्टीच्या माध्यमातून आपल्या सर्व गैरव्यवहाराकडे लक्ष ठेवून आहे व आपल्या वाईट कृत्यांचे परिणाम आपल्याला कालांतराने भोगावे लागतील हे देखील समजत नाही. यासाठी श्रीमद भागवत आपल्याला आठवण करून देते की सूर्य, अग्नी, आकाश, वायू, देवता, चंद्र, संध्याकाळ, दिवस, रात्र, दिशा, प्राणी, भूमी तथा परमात्मा हे सर्व जीवांच्या कार्याचे साक्षीदार आहेत. काही लोकांची गैरसमजूत आहे की मी काही केले तर कोणाला काय समजणार आहे? कोण काय करणार आहे? त्यांनी वरील साक्षीदार ध्यानात ठेवावेत. आणखी एक पुरावा म्हणजे आपल्या जीवनात येणारी दुःखे जी कोणी मागावयास जात नाही तरी ती आपल्यावर का येतात तर वरील सर्व साक्षीदार आहेत आणि आपण केलेल्या प्रत्येक कृत्याची नोंद केली जाते आणि त्यानुसार आपल्याला शिक्षा दिली जाते. आपण केलेल्या गोष्टी विसरून जातो पण वरील साक्षीदार त्या विसरत नाहीत. आपल्याला कळणार पण नाही की कोणते दुःख कशामुळे येते पण एवढे मात्र नक्की आहे की आपण भगवंताची फसवणूक करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि शेवटी जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण ही दुःखे तर सर्वानाच भोगावी लागतात कारण भगवंतांना फसवून आपण या भौतिक जगात सुख शोधण्याच्या प्रयत्न करत आलो आहोत आणि स्वतःच आपली फसवणूक करून घेतली आहे. हिरण्यकश्यपूच्याबाबतीत हेच झाले. त्याने ब्रह्मदेवाला फसवून काही वर मागून घेतले पण भगवंतांनी त्या सर्व वरांचा मान ठेवून नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला ठार केले.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या विशेष अवताराचे वर्णन करताना म्हणतात, कोपोनियां पिता बोले प्रल्हादाशी । सांग ह्रिषीकेशी कोठे आहे ।।1।। येरु म्हणे का÷ाr पाषाणी सकाळी । आहे वनमाळी जेथे जेथे ।।2।। खांबावरी लाथ मारिली दुर्जने । खांबी नारायण म्हणताच ।।3।। तुका म्हणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्म दचकला ब्रह्मलोकी ।।4।। अर्थात प्रल्हादाचा पिता रागाने त्याला विचारू लागला-‘सांग कुठे आहे तुझा हृषिकेश?’ प्रल्हाद म्हणाला ‘का÷ाr-पाषाणी जिथे तिथे वनमाळी आहे. खांबामध्ये सुद्धा नारायण आहे.’ प्रल्हादाने असे म्हणताच त्या दुष्टाने खांबाला लाथ मारली. तो खांब असा काही कडाड्कन दुभंगला आणि नरसिंह भगवान अवतीर्ण झाले, तेव्हा सत्यलोकात ब्रह्मासुद्धा दचकला. तात्पर्य काय तर आपण भगवंतांना फसविण्याचा प्रयत्न न करता प्रल्हादासारख्या भगवंताच्या शुद्ध भक्ताकडून श्री हरिला शरण कसे जावे हे शिकले पाहिजे.
वृंदावनदास