शिवाजी रोडशेजारी नाल्यात कचऱयाचा ढीग : नाल्याची स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोनवाळ गल्ली नाल्याची स्वच्छता व्यवस्थित होत नाही. अशातच नाल्याची भिंत कोसळल्याने पावसाळय़ात नाला ओव्हरफ्लो होऊन नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसले होते. सध्या नाल्यामध्ये कचरा साचला असून प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच निर्माण झाला आहे. परिणामी नाला की, कचरा डेपो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शिवाजी रोडशेजारील नाल्यामध्ये पाण्याच्या व कोल्ड्रींक्सच्या बाटल्यांचा थर साचला आहे. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्यामध्ये मोठय़ाप्रमाणात कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. यापूर्वी दोन ते तीन महिन्यांतून एकदा शिवाजी रोडशेजारील नाल्यामधून कचरा काढण्यात येत होता. पण यंदा कोनवाळ गल्ली नाल्याची स्वच्छता करण्यात आली नाही. परिणामी नाल्यामध्ये कचरा साचला असून नाला की कचरा डेपो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच नाल्यामध्ये टाकण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या काढण्याचा प्रयत्न काहीजण करीत आहेत.
स्वच्छता करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कोनवाळ गल्ली नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याने यापूर्वी सलग दोन वर्षे घरांमध्ये पाणी शिरले होते. सध्या नाल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. पण शिवाजी रोड परिसरात नाल्याचे बांधकाम आणि स्वच्छता करण्याच्या कामाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाळय़ात नाल्याचे पाणी घरात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. नाल्याच्या स्वच्छतेचे काम तातडीने करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.