प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्लीला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. येथील नळांना डेनेजमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने कोनवाळ गल्लीतील नागरिक वैतागले असून याबाबतचे निवेदन कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी व्ही. ए. चंद्रप्पा यांना देण्यात आले.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोनवाळ गल्लीत डेनेजमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दुसऱया ठिकाणाहून पाणी आणण्याची वेळ आली आहे. हे डेनेजमिश्रित पाणी ना पिण्यासाठी योग्य आहे ना वापरण्यासाठी, त्यामुळे नागरिकांना धुणी-भांडी करण्यासाठीदेखील दुसऱया ठिकाणाहून पाणी आणण्याची वेळ आली आहे. ही समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून तशीच आहे.
याबाबत महापालिकेला निवेदन देऊनदेखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोनवाळ गल्लीतील नागरिकांनी मंगळवारी कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याबाबत निवेदन दिले. याप्रसंगी अशोक बेळगावकर, गुरुराज चांदेकर, शशिकांत हावळ, दिनेश देसुरकर, रामचंद्र वाळके उपस्थित होते.