अडीच लाखांचे मोठे नुकसान : गावात भीतीचे वातावरण
उचगाव / वार्ताहर
कोनेवाडी गावामध्ये चार गवतगंज्यांना आग लागल्याच्या प्रकाराने व दुचाकी वाहन गावाच्या वेशीपाशी आणून टाकल्याच्या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल गावात उलटसुलट चर्चा असून या घटनेत दोन ते अडीच लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी की, गावच्या प्रवेशद्वारापाशी सतीश यल्लाप्पा भातकांडे, जोतिबा यल्लाप्पा भातकांडे, परशराम यल्लाप्पा भातकांडे व नारायण गुंडू भातकांडे यांची राहती घरे असून घराशेजारीच जनावरांचा चारा वर्षभरासाठी या शेतकऱयांनी गंज्या घालून ठेवला होता.
रात्री दोनच्या सुमाराला आगीच्या आवाजाने भातकांडे कुटुंबीय खडबडून जागे झाले. घराबाहेर येऊन पाहतात तर चारही गवतगंज्यांना आगीने वेढल्याचे दिसून आले. आग विझविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आला. मात्र तो निष्फळ ठरला. मुक्मया जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. या घडलेल्या प्रकारामुळे भातकांडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता.
अज्ञात दुचाकी वेशीजवळ
सोमवारी रात्री कोनेवाडी गावातील महेश यल्लाप्पा कंग्राळकर यांची ऍक्टिव्हा केए ई एक्स 6784 ही दुचाकी घरासमोर लावण्यात आली होती. सदर वाहन गावाच्या वेशीजवळ नेऊन टाकण्यात आले होते. या प्रकारामुळे गावात लागलेल्या गवतगंज्यांना आगी व दुचाकी वाहन हा सर्व प्रकार सूडबुद्धीनेच केला असावा, अशी चर्चा जमलेल्या नागरिकांतून केली जात होती. या दुचाकी वाहनाचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे. सदर घटनेचा पंचनामा काकती पोलीस स्टेशनच्या अधिकारीवर्गाने प्रत्यक्ष पाहणी करून केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत..