जनावरांच्या खरेदी विक्रीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाकरे / प्रा.एस.पी.चौगले
पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कोपार्डे (ता.करवीर) येथील जनावरांच्या आठवडी बाजाराला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असून शनिवार दि.३१ रोजी झालेल्या जनावरांच्या बाजारात ७० जनावरांची खरेदी विक्री होऊन सुमारे ३५ लाखांवर रुपयांची उलाढाल झाली. जनावरांचा बाजार सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
२५ मार्च रोजी देशासह महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने ३१ मार्चपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला कोपार्डे (ता. करवीर) येथील शनिवारचा जनावरांचा आठवडी बाजार तब्बल ७ महिने बंद होता. ऐन पेरणीच्या हंगामात मे महिन्यात हा बाजार बंद असल्याने जनावरांची खरेदी विक्री बंद झाली होती. तसेच सध्या सुगीचा हंगाम सुरू झाला असून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे जनावरांची खरेदी-विक्रीची सुरु होणे गरजेचे होते. जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती.
म्हणून शिवसेनेचे करवीर तालुका उपप्रमुख व्ही. जी. पाटील, पोलीस पाटील जालिंदर जामदार ,दत्तात्रय पाटील,गोविंदा पाटील,श्रीधर पाटील,सागर जामदार,अनिल पाटील,एल.आर.कांबळे यांच्यासह शेतकरी व अन्य पदाधिकाऱ्यांनी कोपार्डे ग्रामपंचायतीचे प्रशासक बी.एच.जगताप व ग्रामविकास अधिकारी एम.एस. पाटील यांना निवेदन देऊन जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्याकडे पत्राद्वारे कळवले होते. त्यांनी जागेचे निर्जंतुकीकरण करणे आणि कोरोनाबाबत दक्षता घेऊन बाजार सुरू करण्यास परवानगी दिली होती. ग्रामपंचायतीने तातडीने बाजाराच्या परिसराची स्वच्छता करून हा बाजार भरवण्यासाठी तातडीने पावले उचलली आणि शनिवारी हा आठवडी बाजार भरवला.
शनिवारी दि.३१ रोजी बाजाराचा पहिला दिवस असल्याने नेहमीपेक्षा या बाजारात निम्मी उलाढाल झाली. बाजारात सुमारे ३० बैल,४० गायी आणि ५० म्हैशी अशी १२० जनावरे खरेदी विक्रीसाठी आली होती. त्यापैकी ७० जनावरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण झाले अशी माहिती ग्रा.पं.क्लार्क सरदार पाटील यांनी दिली .बाजारात सर्वसाधारण ३५ लाखांवर रुपयांची उलाढाल झाली. तसेच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात १० हजार रुपयांची भर पडली, ग्रामपंचायतीचे बाजाराचे पूर्वी सरासरी उत्पन्न २० हजार रुपये होते.बाजाराचा पहिलाच दिवस असूनही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जनावरांच्या बाजाराबरोबरच भाजीपाला, फळे, मिरच्या, खुरपे दोऱ्या तसेच अन्य वस्तूंची हजार रुपयांची खरेदी विक्री झाली. या बाजारामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून पुढील आठवड्यात बाजार पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची चांगली सोय-व्ही. जी. पाटील
जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी आग्रही असलेले शिवसेनेचे करवीर तालुका उपप्रमुख व्ही. जी. पाटील यांनी जनावरांचा बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगली सोय झाल्याचे सांगून ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हा बाजार सुरू केल्याने समाधान व्यक्त केले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना -संजय पाटील
खुपिरे (ता. करवीर) येथील दूध उत्पादक आणि श्री बजरंग दूध संस्थेचे माजी चेअरमन संजय पाटील यांनी कोपार्डे जनावरांचा बाजार सुरू झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे सांगितले. हा जनावरांचा आठवडी बाजार सुरू होणे गरजेचे होते असे ते म्हणाले.