बेंगळूर : तब्बल 150 वेळा कूपनलिका खोदून देखील पाणी न लागल्याने हतबल झालेल्या शेतकऱयाने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 151 व्या प्रयत्नात त्याला यश आले. मात्र, यासाठी त्याची 15 वर्षे खर्ची पडली. कोप्पळ येथील शेतकरी अशोक मेठी या 53 वर्षीय शेतकऱयाने हार न मानता कूपनलिका खोदकाम सुरूच ठेवल्याने अखेर जलगंगा अवतरली. कोप्पळ येथील शेतकरी अशोक मेठी मागील 15 वर्षांपासून आपल्या शेतजमिनीत कूपनलिका खोदत होता. या कालावधीत त्याने 150 वेळा प्रयत्न केले. मात्र, कूपनलिकेला पाणीच लागत नसल्याने तो निराश झाला. तरीही त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर मागील आठवडय़ात त्याने पुन्हा कूपनलिका खोदली अन् पाणी उपलब्ध झाले. सुमारे 24 एकर शेतजमीन त्याच्याजवळ आहे. शेतीला मुबलक पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने मागील 15 वर्षांपासून कूपनलिका काढण्यासाठी 150 वेळा प्रयत्न करून सुद्धा थेंब पाणी लागले नव्हते. 151 व्या प्रयत्नात कूपनलिकेला पाणी लागल्याने अशोक आणि त्यांच्या कुटुंबाला अत्यानंद झाला आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना त्याने, आपण पाण्यासाठी अनेक प्रकारच्या मशिनी, आधुनिक यंत्रोपकरणांचा वापर केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता आपले दुःख दूर झाले आहे. जमिनीत पाणी न लागल्याने पावसाच्या पाण्यावरच शेती अवलंबून होती. शेतापासून मैल लांब असणाऱया कूपनलिकेतून शेतापर्यंत पाईपलाईनने पाणीपुरवठा करावा लागत होता, असे त्याने सांगितले आहे.
Previous Articleसातवा निमंत्रितांचा साईराज चषक मोहन मोरे संघाकडे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.