श्रीस्थळ येथील बैठकीत काणकोण कोमुनिदादीच्या अध्यक्षांचा आरोप, वन खात्यावरही टीका, मालकी हक्क दाखविण्याची मागणी
प्रतिनिधी / काणकोण
श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील कोमुनिदादीच्या मालकीच्या जमिनीच्या बाबतीत जो घोटाळा झालेला आहे त्यात कोमुनिदादीचे काही भागधारकच गुंतले आहेत आणि त्यासाठी गोविंद शेणवी नामक व्यक्तीचा ढालीसारखा वापर केला जात आहे, असा स्पष्ट आरोप काणकोण कोमुनिदादीचे अध्यक्ष शरद देसाई यांनी केला आहे. तर जी जमीन वन खात्याने आरक्षित केलेली आहे त्या जमिनीचा मालकी हक्क अजूनही वन खात्याकडे नसल्यामुळे सदर जमिनीवरील काजूचे पीक आपण स्वतः महाजनांकरवी काढून घेणार आहे, असा इशारा श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी दिला.
काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी वन विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली ही बैठक बोलाविली होती. या बैठकीला वन खात्याचे उपवनपाल नंदकुमार परब, वनाधिकारी आनंद मेत्री, एस. के. फर्नांडिस, काणकोणचे मामलेदार विमोद दलाल, श्रीस्थळचे सरपंच दत्ता गावकर, काणकोण कोमुनिदादीचे अध्यक्ष शरद देसाई, ऍटर्नी धीरज गावकर, श्रीस्थळ श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, ऍटर्नी जयेश ना. गावकर, काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत आणि श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
1974 साली वन खात्याने मूळ धुप्यामळ येथील जमीन आरक्षित केली होती. त्यावेळी सर्व्हे नंबरचा वापर न करता मात्रिजच्या आधारावर ही जमीन घेतली. मात्र काजूची लागवड धुप्यामळच्या जमिनीऐवजी सर्व्हे क. 185/0 या जमिनीवर करण्यात आली. अजूनपर्यंत या जमिनीच्या मालकी हक्काचे कसलेच दस्तऐवज वन खात्याकडे नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. वन खात्याचे अधिकारी त्यासंबंधीचा दस्तऐवज सादर करू शकले नाहीत. मात्र ही जमीन वन खात्याच्या मालकीची आहे आणि त्यासाठी म्युटेशन अर्ज करण्यात आलेला आहे, अशी माहिती यावेळी परब यांनी दिली.
वन खात्याला दोन महिन्यांची मुदत
श्रीस्थळ येथील जी जमीन कोमुनिदादीच्या नावे आहे ती मूळ श्री मल्लिकार्जुन देवाची आहे. कोमुनिदाद आणि देवस्थान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे वन खात्याने आपला मालकी हक्क प्रथम दाखवावा, अशी मागणी राजेंद्र देसाई यांनी यावेळी केली. वनखाते मागची 40 वर्षे बेपर्वाईने वागले. वन खात्याने ज्या जमिनीवर सध्या काजूची लागवड केलेली आहे त्या ठिकाणी सर्वेक्षण करून जागा मापून घ्यावी व जागा निश्चित करावी, अशी मागणी करून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत यावेळी देण्यात आली.
बेकायदेशीर बांधकामे थांबविण्याची मागणी
याच भागात सर्व्हे क्र. 186 या जमिनीच्या बाबतीत गोविंद शेणवी यांचे नाव लागलेले असून त्याची चौकशी करण्यात यावी आणि या ठिकाणी चालू असलेली बेकायदा बांधकामे त्वरित थांबविण्यात यावीत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. याच जमिनीवर जवळजवळ 27 बेकायदेशीर बांधकामांना स्थानिक पंचायतीने जे घर क्रमांक दिलेले आहेत त्याची त्याचप्रमाणे जनावरांच्या चराईसाठी राखून ठेवलेल्या 55 हजार चौ. मी. जमिनीसंबंधी चौकशी करण्याच्या मागणीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दोन महिन्यांनंतर निघेल तोडगा ः फर्नांडिस
श्रीस्थळ येथील कोमुनिदादीच्या जमिनीवरील अतिक्रमणाशी आपला कसलाच संबंध नाही. आपल्यावर जे नाहक आरोप करण्यात आले त्यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन ही बैठक बोलाविली. दोन महिन्यांच्या मुदतीनंतर यावर योग्य तोडगा निघेल, असे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या इजिदोर फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. यावेळी जयेंद्र तुबकी, उमेश तुबकी, दिवाकर भगत, पवन तुबकी, ऍड. विराज नागवेकर, विकास भगत, सरपंच दत्ता गावकर, प्रलय भगत आणि अन्य नागरिकांनी चर्चेत भाग घेऊन शंका मांडल्या. उपस्थित अधिकाऱयांनी त्या शंकांचे निरसन केले.