प्रतिनिधी/सातारा
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणास 60 वर्ष पूर्ण झाली या धरणासाठी ज्यांनी आपली जमीन घर दार पणाला लावले त्या धारणग्रस्तनांचे अद्यापही पुनर्वसन न झाल्याने आजही हजारो लोक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांनी व त्याच्या तिसऱ्या पिढीनेही आता शासनाकडे न्याय मागण्यासाठी एल्गार पुकारला असून लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गाव, वड्यावस्त्या राहणाऱ्या धरणग्रस्तनी घराच्या अंगणात आपल्या कुटुंबासह बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात 10 हजार धरणग्रस्त सहभागी झाले आहेत
६० वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांपैकी हजारो प्रकल्पग्रस्तांचा आणि त्यांच्यामधूनच निर्माण झालेल्या अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन प्रलंबित आहे. गेल्या 3 वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय होऊनही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही या प्रकल्पग्रस्तांची एकही मूलभूत समस्या मार्गी लागलेली नाही. यामुळे उपासमारीने मरण्यापेक्षा लढून मेलेले जास्त योग्य होईल अशा निर्णयाला येऊन या प्रकल्पग्रस्तांनी कायद्याच्या चौकटीत आणि शांततामय मार्गाने लढा करण्याचा घेतला आहे .
सोमवारपासून हा लढा सुरू झाला आहे. हे आंदोलन कोयना धरणग्रस्त असलेल्या सातारासह विविध जिल्ह्यातील शेकडो गावात मोठया प्रमाणात आपापल्या घरासमोरील आंगणामध्ये आंदोलन सुरू आहे या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर, हरिश्चंद्र दळवी, मालोजी पाटणकर , महेश शेलार, सचिन कदम, चैतन्य दळवी, सीताराम पवार, रामचंद्र कदम, अर्जुन सपकाळ, परशुराम शिर्के यांच्यासह हजारो धरणग्रस्त आबालवृद्धबरोबर सकाळपासून ठिय्या मांडून बसले होते. या वेळी’ जमीन नाही, पाणी नाही, त्यामुळे मजुरी नाही’, ‘जमीन द्या जमिनीला पाणी द्या, तोपर्यंत निर्वाहभत्ता तरी द्या,’ ‘महानिर्मितीच्या सवलती लागू करा’, ‘कोयना धरण होताना उठवलं, अभयारण्यातून उठवलं, माळावर आणून सोडलं, उरलं सरलं जगण कोरोणाने मोडला’.अशा घोषणा देण्यात आल्या.
श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर म्हणाले, महाराष्ट्र सरकारने धरणग्रस्त्यांच्या मागण्या संदर्भात तातडीने निर्देश होऊन लवकरात लवकर कारवाई करावी. दिलेल्या निवेदनातून सर्व वस्तुस्थिती आपल्या ध्यानात येईल अशी खात्री वाटते आजही महाराष्ट्राची एक सर्वात महत्वाची जीवांनरेखा असलेल्या कोयना धरणामुळे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी झालेल्या महकाय अभयारण्यामुळे बाधित झालेल्या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा प्रश्न या परिस्थितीत गुंतलेला आहे कोणत्याही माणुसकी आणि सामाजिक कृतज्ञतेची जाणीव असलेल्या व्यक्तीला या परिस्थितीमुळे उद्विग्न झाल्यावाचून पर्याय राहू शकत नाही.