प्रतिनिधी/ नवारस्ता
जून महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात संततधार कोसळणाऱया पावसामुळे कोयना धरणात पाण्याची जोरदार आवक सुरु झाली त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातील पाणीसाठा अर्धशतक गाठेल, अशी शक्यता असतानाच पाणलोट क्षेत्रातील पाऊस गायबच झाला आहे. परिणामी पायथा वीजगृहातून सुरू केलेला विसर्ग बंद करूनही धरणातील पाणीसाठय़ात अत्यंत धिम्या गतीने वाढ सुरू राहिली असल्याने गेल्या आठ दिवसांपासून धरणातील पाणीसाठा चाळीशीतच अडकला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जूनच्या पहिल्याच आठवडय़ात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. परिणामी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूच असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी 18 जून रोजी सकाळी 11 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आला होता.
मात्र गेल्या आठ दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर अत्यंत कमी झाला असल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात येणारी आवक ही कमी होत गेली.परिणामी सलग 12 दिवसांपासून अखंडित सुरू असलेले धरणाचे पायथा वीजगृह 29 रोजी सायंकाळी साडे पाच वाजता बंद करण्यात आले.
सध्या पाणलोट क्षेत्रात तर पाऊस गायबच झाला असल्याने धरणात अत्यल्प पाण्याची वाढ सुरू आहे त्यामुळे जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी धरणातील पाणीसाठा 40 ते 42 टीएमसीच्या घरातच आहे.
दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजेपर्यत कोयनानगर येथे 01 (925) मिलिमीटर, नवजा येथे 02 (1091) मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 34 (1287) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याने धरणात प्रतिसेकंद 2 हजार 842 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून शुक्रवारी सायंकाळी पाच पर्यंत धरणाची पाणीपातळी 2097.7 फूट असून धरणात 42.22 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.